खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी, औषधांच्या दुकानातही रांगा
प्रतिनिधी / बेळगाव
क्लोजडाऊनची घोषणा झाली आणि हाती असलेल्या अवधीमध्ये पंधरा दिवसांसाठी सामानांची तजवीज करण्याची घाई उडाली. परिणामी मध्यवर्ती बाजारपेठेत गर्दी झाली. शिवाय ठिकठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. त्याचबरोबर आपापल्या गावी पोहोचण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांनी गर्दी केली.
दरम्यान, बुधवारपासून क्लोजडाऊन असल्याने बहुसंख्य दुकानदारांनी सकाळी लवकर दुकाने उघडून जमेल तितका व्यापार पदरात पाडून घेतला. क्लोजडाऊनमध्ये कपडय़ांची दुकाने बंद राहणार असल्याने शटर अर्धे उघडून खरेदी करण्याची संधीही दुकानदारांनी दिली. कोरोनाची तीव्र लाट लक्षात घेता कर्फ्यू आणि लॉकडाऊन याबाबत साधारण अंदाज आलाच होता. त्यामुळे महिलांनी धान्यांची खरेदी करून वाळवण देऊन साठवण केलीच होती. यामध्ये वर्षभराचे तिखट महत्त्वाचे होते.
तथापि, पंधरा दिवसांसाठी प्रामुख्याने साबण, चहापूड आणि भाजी खरेदीला प्राधान्य दिसून आले. वास्तविक सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार असल्या तरी संभाव्य गर्दी लक्षात घेत नागरिकांनी मंगळवारीच खरेदी उरकली. औषधांच्या दुकानातही रांगा दिसून आल्या.
मंगळवारी बाजारपेठेत फळ व फूल विपेते यांचा भरणा अधिक होता. द्राक्षे, कलिंगड, अननस व आंबा या फळांची आवक वाढली आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत 400 ते 500 रुपये दर सांगणाऱया फळ विपेत्यांनी मंगळवारी 200 रुपये असा दर केला. कोरोना काळात संत्री खावीत असे सांगण्यात येत असल्याने संत्र्यांचा भाव मात्र वधारला आहे. संत्री 160 रुपये डझन आहेत. सफरचंदांचा दर 200 रुपये होता.
गोव्याला जाणाऱयांची गैरसोय
गोव्याला जाण्यासाठी मात्र असंख्य प्रवासी ताटकळत होते. गोव्याला किमान एक तरी बस सोडावी, असा आग्रह प्रवाशांनी नियंत्रकांकडे धरला होता. बेळगाव-कोल्हापूर मार्गाच्या बस फक्त निपाणीपर्यंत सोडण्यात येत होत्या. बसस्थानकाच्या परिसरात बहुसंख्य किरकोळ विपेत्यांनी मास्क, फळे व कपडे विक्री सुरू केल्याचे दिसून आले. दरम्यान, चन्नम्मा सर्कल येथील ग्रामीण बसस्थानक मात्र प्रवाशांविना पूर्ण रिकामे होते. बाजारपेठेत रात्री आठपर्यंत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. साडेआठनंतर गर्दी ओसरली.
लांब पल्ल्याच्या बसेसही सोडल्या
एकीकडे खरेदीसाठी गर्दी झाली असताना दुसरीकडे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली. बसस्थानकावर वाहतूक नियंत्रकांशी चर्चा करता त्यांनी बससेवा सकाळपासून सुरू आहे. म्हैसूर, विजापूर, चिकोडी अशा लांब पल्ल्याच्या बसही सोडण्यात आल्या आहेत. नजीकच्या परिसरासाठी असणारी बससेवा रात्री 8 पर्यंत व लांब पल्ल्याची बससेवा सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्याची सूचना आली असल्याचे त्यांनी सांगितले.