अधिकारी मेताकुटीस : सरपंच होताहेत स्थानिकांचे टार्गेट
दिगंबर वालावलकर / कणकवली:
चाकरमान्यांची गावी येण्याची संख्या विचारात घेता गावा-गावांमधील शाळांमधील क्वारंटाईन कक्षांची व्यवस्था आता कमी पडू लागली आहे. एकीकडे गावात आल्यानंतर प्रशासन परजिह्यातील चाकरमान्यांची क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करत असताना आता मोठय़ा प्रमाणात येणाऱया चाकरमान्यांमुळे प्रशासनाचेही प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यामुळे मुंबई किंवा परजिह्यातून येणाऱयांबाबत आता ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोना रोखणे जिह्याला कठीण जाणार आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱयांच्या स्तरावरून याबाबत निर्णयाची गरज आहे.
गेले चार दिवस जिह्याच्या सीमेवर खारेपाटण येथे चाकरमान्यांच्या वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या आहेत. जिह्यात येत असलेले चाकरमानी हे गावातील शाळा, हॉल, आदी ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवण्यात येत असताना या जागाही आता कमी पडू लागल्या आहेत. आतापर्यंत अधिकृतरित्या जिह्यात 12 हजार 800 चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र, या लोकांची क्वारंटाईनची व्यवस्था होतेय का? प्रशासनाला सर्व सहकार्य मिळतेय का? याचाही विचार करण्याची गरज आहे. क्वारंटाईनच्या काही ठिकाणी सुविधांचाही अभाव आहे. प्रशासन यामुळे अगदी मेटाकुटीस आले आहे. याबाबत राजकीय नेत्यांनी गांभीर्याने फेरविचार करण्यासाठी दबाव आणण्याचीही गरज निर्माण झाली आहे.
आलेल्यांना ठेवायचे कुठे?
गावांमध्ये दाखल होत असलेल्या चाकरमान्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शाळा, हॉलमध्ये ठेवण्यात येते. आता ही जागा अपुरी पडू लागल्याने नव्याने दाखल होणाऱया चाकरमान्यांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवस – रात्र काम करणारे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारीही गेले दोन महिने प्रचंड दबावाखाली काम करत असून त्यांनाही ही सारी व्यवस्था करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच महसूल, पोलीस व आरोग्य विभाग वगळता अन्य विभागांकडून कोरोनाच्या साथीत फारसे गांभीर्याने काम केले जात नसल्याचाही सूर काही अधिकाऱयांकडून व्यक्त केला जात आहे.
चाकरमान्यांची संख्या चिंता वाढविणारी!
आरोग्य व्यवस्थेत अनेक त्रुटी असतानाही जिल्हा प्रशासनाने अगदी कसोटीच्या काळातही कौतुकास्पद काम केले आहे. मात्र, आता प्रशासनावरही मर्यादा येत आहे. रोज जिह्यात दाखल होणारी चाकरमान्यांची संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे. मात्र, याबाबत नेतेमंडळींकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. गावांमधील शाळा चाकरमान्यांनी भरल्या तर शहरी भागातही यासाठीची व्यवस्था नाही, याचा विचार व्हायला हवा. पेड क्वारंटाईनचा पर्याय कितीजण स्विकारतात, ते पाहणे महत्वाचे आहे. त्यातच क्वारंटाईन कक्षासाठी शहरी किंवा ग्रामीण भागात सर्वच आपल्या इमारती पुढे येऊन देत नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी सर्वांनीच समजून घ्यायला हव्यात. त्यादृष्टीने चाकरमान्यांना ई पास देण्याचा निर्णय घ्यायला हवा.
गावात सरपंच टार्गेट
गाव पातळीवर क्वारंटाईन करण्यात येणाऱया व्यक्तींची व्यवस्था करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या ग्राम सनियंत्रण समितीसमोरही अनेक समस्या आहेत. वस्तीलगत शाळा आहेत, तेथील ग्रामस्थांच्या रोषाला सरपंचांना समोरे जावे लागत आहे. त्यातच शाळांच्या मुख्याध्यापकांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्या ठिकाणी शिक्षकांचीही मोठी गैरसोय आहे. रात्रीच्या वेळी क्वारंटाईन कक्षाच्या ठिकाणी काय करायचे, असा प्रश्न ग्राम सनियंत्रण समितीसमोर आहे. रात्रीच्या वेळी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या असताना असे स्वयंसेवकही अपवाद वगळता राहायला तयार नाहीत.
नव्याने येणाऱयांचे करायचे काय!
काही ठिकाणी क्वारंटाईन कक्षात असणाऱया व्यक्ती खुलेआम फिरत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. मात्र, तालुका पातळीवर असलेला कामाचा ताण पाहता या समस्यांबाबत आता थेट कारवाई होणे कठीण झाले आहे. गावात बंद घरांमध्ये क्वारंटाईन करण्याचा मुद्दा काही दिवसापूर्वी पुढे आला. पण ज्यांची घरे बंद ते मुंबई किंवा परजिह्यातून आले त्यांना होम क्वारंटाईन केले तर प्रश्न मार्गी लागेल. पण ज्यांची गावातील घरे उघडी आहेत, त्या घरात रेड किंवा ऑरेंज झोनमधून व्यक्ती आली तर त्याच्याकडून घरातील इतरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले तर ती सोय आता अपुरी पडू लागली आहे, मग अशा नव्याने येणाऱयांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.