नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी सरकारी वसतिगृहांसह अधिकारी-कर्मचाऱयांचीही कमतरता
प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यांतून येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्यात येत आहे. शहरातील विविध हॉस्टेलमध्ये नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सध्या परराज्यांतून येणाऱया नागरिकांची संख्या जास्त असल्याने क्वारंटाईन करण्यासाठी वसतिगृहे कमी पडू लागली आहेत. तसेच नोडल अधिकारी म्हणून मनपाच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याने कर्मचारीदेखील अपुरे पडू लागले आहेत.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने परराज्यात अडकलेले नागरिक स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गोवा वगळता अन्य राज्यांमधून बेळगावात येणाऱया नागरिकांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. विशेषत: दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, राजस्थान अशा विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याने राज्य शासनाने ही खबरदारी घेतली आहे. अजमेरहून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. ही संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने राज्य शासनाने परराज्यांतून येणाऱया प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून त्यांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्याचा आदेश दिला होता. ही जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने शहर आणि उपनगरांतील विविध वसतिगृहे आणि सरकारी इमारतींचा ताबा घेऊन त्या ठिकाणी परराज्यांतून येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांत 309 नागरिक बेळगावात दाखल झाले आहेत. कुमार स्वामी लेआऊट येथील मुलांचे वसतिगृह, सैनिक वसतिगृह, सदाशिवनगर येथील महिला वसतिगृह आदीसह विविध ठिकाणी नागरिकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
पेड क्वारंटाईनमध्ये राहणाऱयांची संख्याही मोठी
सरकारी संस्थेत क्वारंटाईन राहण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र क्वारंटाईन करण्यात आलेल्या हॉटेलचे बिल नागरिकांना स्वत: भरावे लागणार आहे. पेड क्वारंटाईनमध्ये राहणाऱया नागरिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे शहरातील विविध हॉटेल फूल्ल झाली आहेत.
दोन शिफ्टमध्ये अधिकाऱयांची नियुक्ती
परराज्यांतून येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन करताना महापालिकेच्या अधिकाऱयांची दमछाक होत आहे. सीपीएड् येथे दाखल होणाऱया नागरिकांची नोंद करून आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाईनच्या ठिकाणी नेण्यात येत आहे. ही जबाबदारी मनपाच्या कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या सरकारी संस्थेत आणि हॉटेलमध्ये नोडल ऑफिसर म्हणून मनपा अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात येत आहे. 24 तास हे काम करावे लागत असल्याने दोन शिफ्टमध्ये अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येत आहे.
मनपा अधिकाऱयांवरच सर्व जबाबदाऱया
तसेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे, रेड झोन परिसरात नजर ठेवणे, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर पाळत ठेवणे, अशा विविध जबाबदाऱया मनपा कर्मचारी व अधिकाऱयांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन नागरिकांना जेवण व नाष्टय़ाची सोय करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी सरकारी वसतिगृह आणि अधिकाऱयांची कमतरता भासू लागली आहे. अन्य सरकारी कार्यालयातील अधिकाऱयांवर जबाबदारी सोपविण्यात आली नाही. केवळ महापालिकेच्या अधिकाऱयांवर ही जबाबदारी सोपविली असल्याने कामाचा ताण वाढला असून नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी अधिकारी अपुरे पडत आहेत.