जिल्हय़ात 1500 शाळा इमारती : सर्व शाळांची साफसफाई सुरू : ग्राम समित्यांमार्फत कार्यवाही
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
चाकरमान्यांना कोकणात आणण्यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतला नसला, तरी त्यांना आणण्यासाठी जोरदार अंतर्गत हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील सर्व शाळा इमारती स्वच्छ केल्या जात आहेत. परंतु, प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह आहेच, असे नाही. असलेच तर एखाद-दुसरे आहे. त्यामुळे चाकरमान्यांना शाळांमध्ये ठेवणे अडचणीचेच ठरणार आहे. आरोग्य यंत्रणेतही मोठय़ा प्रमाणात रिक्त जागा असल्याने आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी मंडळी मात्र मूग गिळून गप्प आहेत. कोरोना संकटाच्या काळातही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत.
मुंबईतील चाकरमानी आणि कोकणातील जनता यांचं अतूट नातं आहे. गणेशोत्सवासारखा मोठा सण, उन्हाळी सुट्टी आणि इतर प्रमुख कार्यक्रमांना चाकरमान्यांचे कोकणात येणे-जाणे सुरुच असते. परंतु, कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू झाल्यानंतर उन्हाळय़ाच्या सुट्टीत हजारोंच्या संख्येने येणारे चाकरमानी मुंबईतच अडकून पडले आहेत. ते आता कोकणात येण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना कोकणात येण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही. पण मुंबईसारख्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने त्यांना कोकणात घेणे धोक्याचेच ठरणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्हय़ाच्या जिल्हाधिकाऱयांनी तर चाकरमान्यांना कोकणात घेण्यास नकारच दर्शवला आहे. तरीही राजकारण्यांकडून चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी हालचाली सुरुच आहेत.
सर्व शाळांची स्वच्छता
मुंबईतून येणारे चाकरमानी किंवा जिल्हय़ाबाहेरून येणारे कामगार, यात्रेकरू, पर्यटक यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहे, धर्मशाळा, भक्त निवास, मंगल कार्यालये, हॉटेल्स अधिगृहित केली गेली आहेत. त्याचबरोबर चाकरमानी मोठय़ा प्रमाणात आल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी जिल्हय़ातील सर्व शाळा स्वच्छ करून ठेवण्यात येत आहेत. शाळा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रत्येक गावच्या ग्राम समित्यांमार्फत शाळांची स्वच्छता केली जात आहे. परंतु, यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे, लाईट, पाणी व्यवस्था नाही. त्याबाबत खऱया अर्थाने विचार होणे आवश्यक आहे.
जिल्हय़ात 1500 शाळा इमारती
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 1500 शाळा इमारती आहेत. प्रत्येक शाळेत स्वच्छता गृहे आहेत. शौचालय, मुताऱयांची सोय आहे. मात्र बाथरुम एकाही ठिकाणी नाही. छोटय़ा शाळांमध्ये एक शौचालय, तर मोठय़ा शाळांमध्ये दोन शौचालये आहेत. पाण्याच्या व्यवस्थेचेही तसेच आहे. काही ठिकाणी नळपाणी पुरवठा, विंधन विहीर आणि काही ठिकाणी शेजारच्या खासगी विहिरीवरून पाणी आणले जाते. त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा नाही. एका-एका शाळेमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती क्वारंटाईन केल्या, तरी सुविधा पुरणार नाहीत. त्यामुळे आंघोळीची अडचण होणार आहे. या सर्व सुविधा असल्याशिवाय चाकरमानी किंवा जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना शाळांमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करणे अडचणीचे ठरणार आहे. शाळांमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यापूर्वी सोयीसुविधा आहेत का, हे बघून त्या निर्माण कराव्या लागणार आहेत.
आरोग्य तपासणीचे काय?
तसेच जिल्हय़ाबाहेरून हजारोंच्या संख्येने लोक आल्यास त्यांची आरोग्य तपासणीही करावी लागणार आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ाची कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, मोठय़ा प्रमाणात लोक जिल्हय़ात आल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो. किंबहूना आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सक्षम करावी लागणार आहे.
नेतेमंडळींची भूमिका काय राहणार?
जिल्हा प्रशासनाने गावात बंद असलेली घरे ताब्यात घेण्याचाही विचार करायला हरकत नाही. शाळांबरोबरच इतर विविध संस्थांच्या इमारतींचाही विचार करावा. मात्र हे करीत असताना तेथे सुविधा आहे का, याचाही प्रामुख्याने विचार करायला हवा. दुसरीकडे कोरोना संकट काळातही राजकारण सुरू ठेवून एकमेकांवर आरोपांच्या फैरी नेतेमंडळींकडून झाडल्या जात आहेत. चाकरमान्यांनाही आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात कोणत्याही सुविधा नसताना जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांची संख्या वाढल्यास कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ शकते, एवढे मात्र निश्चित.