वार्ताहर/ राजापूर
तालुक्यात मुंबईहून आलेल्या 33 चाकरमान्यांना कोरोनाची लागण झालेली असताना काही चाकरमानी 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राजापूर बाजारपेठेत खरेदीसाठी फिरत आहेत. त्यामुळे आतापर्यंत सेफझोनमध्ये असलेल्या बाजारपेठेत कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा चाकरमान्यांना आळा घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका सुरूवातीच्या काळात सेफझोनमध्ये होता. मात्र मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यानंतर शासनाने मुंबईकर चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी परवानगी दिली आणि तालुक्यात चाकरमान्यांच्या सोबतच कोरोनाचा शिरकाव झाला. तालुक्यात आजवर 33 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यापैकी 29 जण उपचाराअंती बरे झाले असून एका रूग्णाचा मृत्यू झाला. चाकरमान्यांमुळे स्थानिक गावकऱयांना कोरोनाचा धोका पोहचू नये, यासाठी सुरूवातीच्या काळात चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. मात्र चाकरमान्यांची वाढती संख्या आणि मर्यादित विलगीकरण कक्षामुळे प्रशासनाकडून चाकमान्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
सुरूवातीचा 28 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी कमी करून आता 14 दिवसांचा करण्यात आला आहे. मात्र सुरूवातीला क्वारंटाईनचे जसे काटेकोर नियम पाळले जात होते तसे आता पाळले जाताना दिसत नाहीत. याचेच उदाहरण म्हणजे क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले नसतानाही हातवार क्वारंटाईनचा शिक्का असलेले चाकरमानी राजापूर शहर बाजारपेठेत फिरताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱया अन्य ग्रामस्थांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळत असताना राजापूर शहर मात्र अद्यापही सेफ झोनमध्ये आहे. मात्र मुंबईहून आलेले चाकरमानी असे बिनदिक्कत फिरत असतील तर राजापूर शहरातही कोरोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. राजापूर शहर बाजारपेठेत जवाहर चौक येथे पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱयांवर चाप बसला होता. मात्र बाजारपेठ सुरू झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून या ठिकाणी पोलीस नसल्याने बाजारात फिरणाऱयांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही. बाजारपेठेत असे चाकरमानी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिक जनतेतून होत आहे.