आप्तांचे दुरूनच होते दर्शन
वार्ताहर / बांदा:
‘क्वारंटाईन’ हा शब्द सध्या सगळय़ांच्या परिचयाचा झाला आहे. मुंबई, पुणे भागात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने तेथील चाकरमानी कोकणची वाट धरत आहेत. ई-पास घेऊन आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. मात्र, सध्या बऱयाच क्वारंटाईन केंद्रांमध्ये भावनेची किनार दिसून येत आहे. क्वारंटाईन झालेल्या आपल्याच मुलाला अथवा मुलीला, आई-वडिलांना लांबूनच पाहण्याची वेळ अनेकांवर आली आहे. त्यामुळे नको ते क्वारंटाईन, अशीही प्रतिक्रिया उमटत आहे.
येथील बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरसकर कनि÷ महाविद्यालय येथे मुंबई व कोल्हापूर येथून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या आठजणांवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर यांच्या नियोजनाखाली खेमराज हायस्कूलचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका दीपा सावंत, गंगाधर काळे, पृथ्वीराज बांदेकर, स्थिरबा टारपे, संजय शिप्रे, विलास घोगळे, विनायक तोरस्कर, दिनेश मोरजे, विलास सावंत, गोविंद गोळवळकर, आनंद गोळवळकर जबाबदारी पार पाडत आहेत.
क्वारंटटाईन केलेल्या आठ व्यक्तींना सकाळपासून सायंकाळपर्यंत भेटायला येणाऱया व्यक्तींची व त्यांच्या नातेवाईकांची नोंद केली जाते. सध्या येथील विलगीकरण केंद्रात आठजणांना ठेवण्यात आले आहे. तेथील गेट बंद करून ठेवण्यात आले आहे. गेटमधून आत वानेही नेता येत नाही. आत जाताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. नातेवाईकांनी आणलेला नाष्टा वा जेवण हे दरवाजावर ठेवला जातो. आरोग्य विभागाप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सतर्कता बाळगण्यात संदर्भात नेमलेल्या शाळेच्या कर्मचाऱयांना तशा सूचना दिलेल्या आहेत.
या विद्यालयाच्या गेटवर मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे. लहान मुलांना सोबत घेऊन विलगीकरण कक्षाकडे जाऊ नका. पेपर डिशचा वापर करा. क्वारंटटाईन व्यक्तीपासून सहा फूट अंतर ठेवा. क्वारंटटाईन होण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्यात यावी. कोरोनामुक्तीसाठी गाव समितीला सहकार्य करा. एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, अशा सूचनांचा त्यात समावेश आहे.