प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यांमधून येणाऱया नागरिकांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सहा राज्यांमधील नागरिकांना कर्नाटकात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण यापूर्वी परवानगी घेऊन आलेल्या नागरिकांनी सरकारी संस्थेत क्वारंटाईन न होता थेट घर गाठले आहे. अशा 26 नागरिकांचा शोध गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱयांनी घेतला.
महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या राज्यांमधून येणाऱया नागरिकांना कर्नाटकात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रमधून कर्नाटकात येणाऱया नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. त्यामुळे नागरिकांनी बेळगावात येण्यासाठी सेवा सिंधु ऍपच्या माध्यमातून परवानगी घेतली होती. पण परराज्यातून येणाऱया नागरिकांना 7 दिवस सरकारी संस्थेत क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. याकरिता सीपीएड मैदानावर नावनोंदणी करण्यासाठी कक्ष उभारण्यात आले आहे. यापूर्वी आलेल्या शेकडो नागरिकांनी हजेरी लावून नावनोंदणी करून सरकारी संस्थेत क्वारंटाईन झाले होते. मात्र गेल्या चार दिवसांमध्ये आलेले नागरिक सीपीएड मैदानकडे फिरकलेच नाहीत. सरकारी संस्थेत क्वारंटाईन होणे आवश्यक असताना त्यांनी थेट घर गाठले होते.
परवानगी दिलेल्या यादीनुसार सीपीएडवर नावनोंदणी न केलेल्या नागरिकांची यादी तपासण्यात आली. चार दिवसात 26 नागरिक सीपीएड मैदानावर नोंदणी करून क्वारंटाईन झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱयांवर सोपविण्यात आली होती. त्यामुळे अधिकाऱयांनी पोलिसांच्या सहकार्याने गुरुवारी 26 नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन केले. महाराष्ट्रामधून येण्यास बंदी घालण्यात आल्याने छुप्या मार्गाने नागरिक येत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनादेखील क्वारंटाईन करण्यात येत आहे.
‘तो‘ क्वारंटाईन न होताच बेळगावात राहून गेला…
महाराष्ट्रामधून येण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक होते. त्यामुळे एका व्यक्तीने प्रशासनाकडून ऑनलाईन परवानगी घेतली. त्यानुसार कोगनोळी नाक्मयावर हजेरी लावून तो बेळगावात आला. पण सीपीएड मैदानावर नावनोंदणी करून सरकारी संस्थेत क्वारंटाईन झाला नाही. त्यामुळे मोबाईलद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही. प्रयत्न करूनही सदर व्यक्ती सापडला नाही. त्यामुळे मोबाईल क्रमांकद्वारा ट्रक केले असता सदर व्यक्ती महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले. त्यामुळे परवानगी घेऊन बेळगावात येवून क्वारंटाईन न होताच तो पुन्हा निघून गेल्याचे निदर्शनास आले आहे.