वार्ताहर/ राजापूर
होम क्वारंटाईन करण्यात आलेले काही इसम दुसऱयाच्या मालकीच्या घराचे कुलूप तोडून रहात असताना संबंधित घर मालकाने त्याबाबत लेखी तक्रार करूनही नाटे पोलिसांकडून त्याची दखलच घेतली नसल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या एकूणच कारभाराबाबत सांशकता निर्माण झाली आहे.
राजापूर तालुक्यातील दळे शिवगणवाडी येथील महेश जयवंत शिवगण यांनी दि.12 जून 2020 रोजी नाटे सागरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. या तक्रारीत त्यांनी दळे ग्रामपंचायत हद्दीत घर नं. 910 हे आपले मालकीचे घर आहे. सध्या हे घर बंद असताना मुंबईत वास्तव्यात असलेले व कोरोनामुळे गावी आलेले शांताराम सिताराम शिवगण व रोशन चंद्रकांत शिवगण यांनी जबरदस्ती आपले बंद घराचे कुलूप तोडले व ते सध्या कुटुंबासहीत या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. या सर्वांना होम कोरोंटाईनचे आदेश करण्यात आलेले आहे.
याबाबत आपण दि.12 जून रोजी नाटे सागरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली आहे. यावेळी योग्य त्या चौकशीसाठी आपणास बोलाविले जाईल असे नाटे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र या घटनेला आठ दिवस होवूनही नाटे पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याचे महेश शिवगण यांचे म्हणणे आहे. आपण रितसर तक्रार अर्ज दिल्यानंतर नाटे पोलिसांनी त्याची दखल घेवून चौकशी करणे अपेक्षित असताना नाटे पोलिस जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा संशय महेश शिवगण यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी आपणास न्याय मिळावा अन्यथा आपण जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.