2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील : उपचार न घेतल्यास वर्षात 10-15 व्यक्तींना संसर्ग
प्रतिनिधी /बेळगाव
सरकारने पोलिओप्रमाणेच क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. क्षयरोग हा जीवाणूजन्य सांसर्गिक रोग आहे. एकेकाळी दुर्धर समजला जाणारा हा आजार आज पूर्ण बरा होऊ शकतो. हा रोग ‘मायक्रोबॅक्टेरियम टय़ुबरक्मयुलोसीस’ नावाच्या जीवाणूंमुळे होतो. याचा शोध 1882 साली डॉ. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने लावला.
ज्या व्यक्तीला क्षयरोग झाला असेल ती व्यक्ती बोलली, थुंकली किंवा शिंकली तरी तिच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात व हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. त्या निरोगी व्यक्तीला क्षयजंतूंचा संसर्ग होतो. साधारण 40 टक्के लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वांनाच क्षयरोग होत नाही. कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. यातील 10 टक्के लोकांनाच प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे जंतू जागे होऊन क्षयरोग होऊ शकतो. उपचार न घेतल्यास रुग्ण एका वर्षात 10 ते 15 व्यक्तींना संसर्ग लावू शकतो.
फुप्फुसाचा क्षयरोग व फुप्फुसेतर अवयवांचा क्षयरोग असे दोन प्रकार असतात. 75 टक्के क्षयरुग्णांना फुप्फुसाचा क्षयरोग असतो, तर 25 टक्के क्षयरुग्णांना फुप्फुसेतर अवयवांचा क्षयरोग होतो. केस व नखे सोडून इतर सर्व अवयवांना क्षयरोग होण्याची शक्मयता असते. फुप्फुसाचा क्षयरोग सांसर्गिक आहे. पण फुप्फुसेतर अवयवांचा क्षयरोग सांसर्गिक नाही.
दोन आठवडय़ांपेक्षा जास्त दिवस खोकला असणे, ताप येणे, रात्री दरदरून घाम येणे, वजन कमी होणे, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक न लागणे, खोकताना रक्त पडणे ही क्षयरोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. आशा कार्यकर्त्या आपल्या नेमून दिलेल्या क्षेत्रात घरोघरी फिरून लक्षणांवरून क्षयरोगाचे संशयित शोधतात. नंतर संशयितांचा कफ नमुना म्हणून घेऊन त्याची मायक्रोस्कोपिक तपासणी केली जाते. यात निदान झाले नाहीतर ‘न्युक्लियर ऍसिड ऍम्लिफिकेशन’ टेस्ट केली जाते.
उपचार न घेतल्यास किंवा अर्धवट सोडल्यास जंतू शरीरभर पसरून माणूस दगावण्याची शक्मयता असते. व्यवस्थित औषधे घेतल्यास, स्वच्छता पाळल्यास व योग्य आहार घेतल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. फुप्फुसाचा क्षयरोग झाला असेल तर सहा महिने औषध घेतल्यावर रोग पूर्णपणे बरा होतो. फुप्फुसेतर अवयवांचा क्षयरोग झाल्यास 9 ते 12 महिन्यांसाठी औषधे घ्यावी लागतात. काही रुग्णांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही. त्यांना 9 ते 18 महिन्यांपर्यंत वेगळी औषधे घ्यावी लागतात. सरकारच्या डॉट्स या उपक्रमांतर्गत सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी व मोफत उपचार केले जातात. डॉट्सची ही औषधे अतिशय प्रभावी व गुणकारी आहेत. साधारणतः चार प्रकारची औषधे दिली जातात.
क्षयरोग कोणाला होऊ शकतो?
प्रतिकारशक्ती कमी असणारे, एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, तंबाखू सेवन करणारे, अस्वच्छ परिसरात काम करणारे, अनियंत्रित मधुमेह असणारे, डायलेसीसचे रुग्ण, स्टेरॉईडचे व कर्करोगाचे उपचार चालू असणारे, क्षयरुग्णांसोबत राहणारे या सर्वांना क्षयरोग होण्याची दाट शक्मयता असते. काही स्वच्छतेचे नियम पाळले तर सोबत राहणाऱया व्यक्तींना याची बाधा होत नाही. क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास जवळील आरोग्य कल्याण केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन भेटावे किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. पुढील उपचार सरकारतर्फे मोफत केले जातात. क्षयरुग्णाने सकस आहार घेणे, मोकळय़ा खुल्या हवेत बसणे, स्वच्छता पाळणे आवश्यक असते. खोकताना तोंडावर रुमाल धरावा. तंबाखूसारखे मादक पदार्थ खाल्ल्यास खोकला वाढण्याचा संभव असतो म्हणून अशा व्यसनांपासून दूर राहावे.
सरकारकडून मदत
निदान चाचणी, तपासणी व सर्व औषधोपचार सरकारतर्फे मोफत केले जातात. निक्षय पोषणअंतर्गत प्रत्येक रुग्णाला पौष्टिक आहार घेण्यासाठी दरमहा 500 रुपये दिले जातात. क्षयरुग्णाची सरकारला माहिती दिल्यास त्या व्यक्तीला 500 रुपये बक्षीस मिळते. ती व्यक्ती खासगी डॉक्टरही असू शकते. खासगी डॉक्टरने यशस्वीरित्या क्षयरुग्णावर उपचार केल्यास त्याला 500 रुपये मिळतात. सर्व क्षयरोगाच्या शस्त्रक्रिया आयुष्मान भारतअंतर्गत मोफत केल्या जातात.
सरकारने ‘निक्षय’ या नावाचे एक पोर्टल तयार केले असून यामध्ये सर्व क्षयरुग्णांची माहिती घातली जाते. भारतात दररोज 1100 लोक क्षयरोगाने मरण पावतात. दरवषी 26,40,000 क्षयरुग्ण सापडतात.
जिल्हय़ात सरासरी 3 ते 4 हजार रुग्ण
बेळगाव जिल्हय़ात सरासरी 3 ते 4 हजार रुग्ण आढळतात. जिल्हय़ात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. याचाच अर्थ बेळगाव जिल्हय़ात दर 100 रुग्णांत 18 जणांचा मृत्यू होतो. जिल्हय़ात केंद्रापेक्षा मृत्यूदर जास्त असण्याचे कारण अनेक एचआयव्ही बाधितांना व वृद्ध लोकांना क्षयरोगाची लागण होते. त्यांची प्रतिकारशक्ती नाजूक असते. त्यातच क्षयरोगाची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्मयता जास्त असते.
क्षयरोग बरा होऊ शकतो. पण माहितीच्या अभावामुळे देशभरात 4 लाख तर राज्यात 3000 लोक मृत्यू पावतात. क्षयरोगाला अद्यापि लोक कलंकित समजतात. दुर्दैवाने प्राथमिक कल्याण केंद्रेसुद्धा सामान्य लोकांना मार्गदर्शन करण्यात अपयशी ठरली आहेत. क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी राज्य सरकारने ‘क्षयरोगाला हरवा, कर्नाटकाला जिंकवा’ ही राज्यव्यापी मोहीम चालू केलेली
आहे. या मोहिमेत समाजातील प्रत्येक घटकाने भाग घ्यावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
जिल्हय़ात सरासरी 1 लाख लोकसंख्येमागे 72 रुग्ण
केंद्र सरकारने 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. सध्या गावोगावी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. आपल्या जिल्हय़ात सरासरी 1 लाख लोकसंख्येमागे 72 क्षयरुग्ण सापडतात. जिल्हय़ात क्षयरोगाचे प्रमाण कमी झाल्यामुळे केंद्र सरकारने बेळगाव जिल्हय़ाला सबनॅशनल सर्टिफिकेट दिलेले आहे.
– डॉ. अनिल कोरबू (जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी)
मागील वर्षाचा जिल्हय़ातील अहवाल
तालुका युनिट | टीबीचे निदान झालेले रुग्ण | बरे झालेले रुग्ण | मृत्यू दर |
अथणी | 352 | 289 | 36 |
बैलहोंगल | 199 | 164 | 70 |
बेळगाव ग्रामीण | 178 | 145 | 20 |
बेळगाव शहर | 402 | 327 | 40 |
चिकोडी | 180 | 144 | 23 |
गोकाक | 472 | 376 | 59 |
हुक्केरी | 213 | 170 | 23 |
कागवाड | 101 | 84 | 12 |
खानापूर | 105 | 89 | 11 |
कित्तूर | 78 | 64 | 6 |
मुडलगी | 176 | 146 | 21 |
निपाणी | 196 | 171 | 16 |
रायबाग | 215 | 173 | 23 |
रामदुर्ग | 243 | 205 | 22 |
सौंदत्ती | 293 | 240 | 39 |
एकूण | 3403 | 2787 (82टक्के) | 421 (11 टक्के) |