वृत्त संस्था/ नवी दिल्ली
भारताच्या वरिष्ठ पुरूष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अभय शर्माने या जागेसाठी आपला अर्ज बीसीसीआयकडे पाठविला आहे.
अरब अमिरातमधील आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत आर श्रीधर भारतीय संघाचे प्रमुख क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून राहणार आहेत. या स्पर्धेनंतर त्यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी संपुष्टात येणार आहे. 52 वर्षी अभय शर्माने यापूर्वी भारत अ, भारताचा 19 वर्षाखालील संघाला तसेच राष्ट्रीय महिला क्रिकेट संघालाही प्रशिक्षक या नात्याने मार्गदर्शन केले आहे. विविध प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने इच्छुकांकडून अर्ज मागविले असून 3 नोव्हेंबर ही शेवटची तारीख जाहीर केली आहे.
अभय शर्माने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत दिल्ली, रेल्वे. राजस्थान या संघांकडून 89 प्रथमश्रैणी सामने खेळले आहेत. 2016 साली झिंबाब्वेच्या दौऱयावर गेलेल्या भारतीय संघाचे अभय शर्मा प्रमुख क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रशिक्षक वर्गामध्ये अभय शर्मा यापूर्वी कार्यरत होते.