प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिह्यातील सुमारे साडेचार हजार वकील मंगळवारी न्यायालयाच्या कामकाजापासून अलिप्त राहले. त्यामुळे शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाबरोबर जिह्यातील 65 न्यायालयात सुमारे 6 हजार 500 खटल्यांचे कामकाज प्रलंबित राहीले. दरम्यान, सर्व वकील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायसंकुलाच्या कमानीजवळ जमा झाले. त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तेथेच ठिय्या आंदोलन केले. खंडपीठप्रश्नी पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी भेट देवून या आंदोलनास पाठिंबा दिला.
कोल्हापूरसह सहा जिह्यांसाठी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, या मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिह्यातील सर्व वकील मंगळवारी न्यायालयीय कामकाजापासून अलिप्त राहले. बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. रणजित गावडे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे संचालक ऍड. विवेक घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे अडीच हजार वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीबाहेर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. वकील आणि पक्षकार न्यायालयीन कामापासून अलिप्त राहिल्यामुळे जिह्यात न्यायालये सुरु आणि खटल्याचे कामकाज बंद असेच चित्र होते.
खंडपीठ मिळवणारच ः आमदार चंद्रकांत जाधव
खंडपीठाचा प्रश्न सोडविला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सहा जिह्यांतील सर्व आमदार व मंत्री भेट घेतील. कोल्हापूरला खंडपीठ खेचून आणणे हेच आमचे आता पहिले उद्दिष्ट आहे, अशी ग्वाही आमदार चंद्रकांत जाधव यांनी आंदोलनस्थळी दिली.