प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याची पुढील दिशा आज शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीत ठरणार आहे. कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या वतीने येथील न्याय संकुलातील राजर्षी शाहू सभागृहात आज सायंकाळी पाच वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्हÎातील बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञांसह विविध तालुक्यातीलही पदाधिकारी, वकील सहभागी होणार आहेत.
कोरोनामुळे खंडपीठ कृती समितीच्या लढ्याला बेक लागला होता. गेली पावणेदोन वर्षे बैठक होऊ शकली नव्हती. आता कोरोनाचा संकट कमी झाल्याने कृती समितीची बैठक घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी बैठक होत आहे. या बैठकीत खंडपीठाच्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
कोल्हापूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे पदसिद्ध अध्यक्ष ऍड. गिरीष खडके आणि असोसिएशन व कृती समितीचे सचिव ऍड. विजयकुमार ताटे-देशमुख यांनी आजच्या बैठकीच्या तयारी माहिती दिली. बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. कोल्हापूर जिल्हÎातील सर्व तालुक्यातील वकिलांच्या बार असोसिएशनबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनना निमंत्रणे पाठविण्यात आली असून सर्वांनी बैठकीत सहभागी होण्याविषयी कळविले आहे. त्याचबरोबर तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकीलही बैठकीत सहभागी होणार आहेत.
महत्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा
खंडपीठाच्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्याबरोबर राज्य शासन, केंद्र शासन आणि न्यायालयाच्या पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आजच्या बैठकीत महत्वपूर्ण मुद्दÎांवर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने बुधवारी आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम म्हणून एक बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ, अनुभवी विधिज्ञांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यावरही चर्चा होणार असल्याचे अध्यक्ष ऍड. खडके आणि सचिव ऍड. ताटे-देशमुख यांनी सांगितले.