फिरोज मुलाणी / औंध
राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत खटाव तालुक्यात आरोग्य विभागाने आतापर्यंत 49हजार 726 कुटुंबाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. या मोहिमेत दोन लाख 67 हजार 479 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
खेडय़ापाडय़ापर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहचल्याने हवालदिल झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ राबवली होती. याकरिता खटाव तालुक्यात 92 आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांचा पथकात समावेश करण्यात आला होता. आरोग्य पथकाने घरोघरी जाऊन नागरीकांच्या शरीरातील तापमान आणि आँक्सिजन पातळी तपासली. तालुक्यातील एकूण 65 हजार 395 कुटुंबापैकी आतापर्यंत 49हजार 726 कुटुंबाची तपासणी पूर्ण झाली आहे. 2 लाख 96 हजार 310 लोकसंख्येपैकी 2 लाख 67 हजार 479 नागरीकांची आरोग्य तपासणी पथकाने केली आहे. या तपासणीत 597 रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली त्यापैकी 479 जणांची तपासणी केली असता 181 बाधित रुग्ण सापडले. तपासणीमुळे त्यांच्यावर लवकर उपचार करणे शक्य झाले. ‘माझे कुटुंब आरोग्य तपासणी मोहीम’ प्रभावीपणे राबवल्यामुळे काही रुग्णांमध्ये लक्षणे कमी असली तरी त्यांच्या शरीरातील आँक्सिजनची लेव्हल कमी असल्याचे आढळून आली. त्यांची रँपिड अँन्टिजेन टेस्ट करून तातडीने इलाज केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आणि धोका टाळण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
कोरोनाबरोबर या तपासणीत मूत्रपिंड, हदयविकार, मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब, यकृताचे विकार, कँन्सर, टी.बी मेंदूचा गंभीर आजार यासारखे 37 हजार 211 रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांवर देखील आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.