कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
मेघोली धरणफुटीला भुगर्भांतर्गत रूपांतरीत खडकातील लेअर (भेग) कारणीभुत आहे. सांडव्यातील गळतीच्या अभ्यासातून `डीएसओ’ने हे समोर आणले हेते. सांडव्याच्या दुसऱया बाजूला भिंतीखालील खडकांतील अशाच छोट्या लेअरमधून पाण्याचा प्रवाह बाहेर पडल्याने दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्यामुळे जिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशननंतरच प्रकल्पाच्या दुरूस्तीचा निर्णय होणार आहे.
भुदरगड तालुक्यातील 10 गावांसाठी मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प 1997 मध्ये मंजूर झाला. तो 2000 मध्ये पुर्ण होताच प्रत्यक्ष पाणीसाठा सुरू झाला. प्रकल्पाचा लाभ 5 गावांतील 336 हेक्टरला होत होता. या मातीच्या धरणाला काही वर्षांपुर्वी सांडव्यानजीक गळती लागली. डॅम सेफ्टी ऑर्गनायझेशनने याची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनचा पर्याय सुचवला. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाच्या हालचालीतून दीड कोटीचा निधीही मंजूर झाला आहे.
मेघोली तलाव बुधवारी मध्यरात्री फुटला. पाण्याचा प्रवाहामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जलसंपदा विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी शुक्रवारी मेघोली येथे भेट दिली. त्यांनी धरण परिसराची दीड तास प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर काही सुचना केल्या. डॅम सेप्टी ऑर्गनायझेशन (डीएसओ) ने दिलेल्या अहवालावरही चर्चा केली.
मुख्य अभियंता गुणाले यांनी तलावाच्या सांडव्यानजीकच्या भिंतीत खडकातील लेअरमुळे गळतीचे कारण यापुर्वीच समोर आल्याचे स्पष्ट केले. या गळतीच्या उलट दिशेला असलेल्या भिंतीतील भुगर्भातील रूपांतरीत खडकांत छोटÎा भेगा आहेत, अशाच एका लेअरमधून पाण्याचा प्रवाह बाहेर पडल्याने तलाव फुटल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे स्पष्ट केले.
गळतीनंतर दोन वर्षांत मेघोली प्रकल्पाचा बऱयापैकी अभ्यास झाला आहे. यामध्ये जिऑलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनचा निष्कर्ष आहे. त्यासाठी दीड कोटीचा निधी आला आहे. हे काम सुरू होण्यापुर्वीच दुर्घटना घडली आहे. आता नाशिक येथील एजन्सीकडून येथील भुगर्भातील खडकांचा अभ्यास, अन्वेषण होणार आहे. त्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. त्याच्या रिपोर्टनंतरच दुरूस्ती करायची की प्रकल्पाची जागा बदलायची, याचा निर्णय होणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले.
मेघोली फुटीनंतर 11 बंधाऱयांचे भरावही वाहून गेले
`मेघोली’च्या लाभक्षेत्रात 11 बंधारे होते. धरण फुटल्यानंतर प्रवाहामुळे कोल्हापूर पद्धतीच्या सर्वच 11 बंधाऱयांचे दोन्ही बाजूंकडील भराव वाहून गेले. चौथा बंधारा अधिक कमकुवत झाला आहे. प्रवाहामुळे जमिनी वाहून गेल्या आहेत, विहिरी गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे शेतीच्या सपाटीकरणासह विविध प्रश्न समोर आले आहेत. दुर्घटनेतंर नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या येथील कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली.