ग्राम पंचायतींनी कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर/ उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये अनेक ठिकाणी खडीमशीनचे जाळे विखुरलेले आहे. सदर खडीमशीन विभागात दगड काढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात खड्डे निर्माण होऊन खाणी तयार झालेल्या आहेत. या खाणींमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांनी आता तलावांचे स्वरुप धारण केले आहे. पाणी भरलेल्या या खाणी मृत्यूचे सापळे बनल्या आहेत. धोकादायक ठरलेल्या या खाणींमध्ये पोहायला गेलेल्या युवकांचे बळी जाण्याच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. तरीही प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
पश्चिम भागातील आंबेवाडी, गोजगा, मण्णूर, सुळगा, कल्लेहोळ, कोनेवाडी, बसुर्ते, बेकिनकेरे, सावगाव, बेळगुंदी, बेनकनहळ्ळी या पट्टय़ात खडीमशीनचे मोठय़ा प्रमाणात जाळे पसरलेले आहे. या भागांमध्ये असलेल्या माळ जमिनीतील दगड काढल्यानंतर मोठमोठे खड्डे पाण्याने भरलेले आहेत. यातील स्वच्छ पाणी पाहून अनेक युवकांना या पाण्यात पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र, पोहण्यासाठी सूर मारल्यानंतर पाण्याखालील शिल्लक मोठे दगड तसेच मध्येच असलेल्या खोल खड्डय़ांचा अंदाज नसल्याने या दगडांना आपटून आतापर्यंत जवळजवळ 20 ते 25 युवकांचे बळी गेले आहेत.
मण्णूर, कल्लेहोळ, सावगाव या गावातील तसेच उपनगरातील अनेक युवकांचे या खड्डय़ांमधून पोहायला जाऊन अपघाती निधन झाले आहे. गेल्या काही वर्षात अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. मात्र, खडीमशीन मालकांनी याची दखल घेऊन यावर कोणत्याच उपाययोजना अद्याप केलेल्या नाहीत. तरी शासनाने तसेच त्या त्या विभागातील ग्राम पंचायतींनी यासंदर्भात खडीमशीन मालकांवर कठोर कारवाई करावी. तसेच खाणींमध्ये बळी गेलेल्या युवकांच्या वारसांना खडीमशीन मालकांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पश्चिम भागातील नागरिकांतून होत आहे.