पाणीपुरवठा मंडळाचा भोंगळ कारभार
प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे ‘पाणी वाचवा’ हे अभियान चालविण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पाणीपुरवठा मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मागील दोन वर्षांपासून पाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे नागरिकांनी तक्रारी करूनही दुर्लक्ष करणाऱया कर्मचारी व अधिकाऱयांवर कोणती कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
खडेबाजार येथे दोन ते तीन ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाणी गळती सुरू आहे. पाण्याची गळती होऊन रस्ताही खराब होत आहे. रस्त्यात पाणी राहिल्याने जोरात वाहने जाताच ते येणाजाणाऱया नागरिकांच्या अंगावर उडत आहे. तसेच हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
खडेबाजार परिसरात एका ठिकाणची गळती काढण्यात आली परंतु उर्वरित दोन ते तीन ठिकाणी अद्याप पाण्याची गळती सुरू आहे. दोन वर्षांपासून पाणी वाया जात असले तरी, पाणीपुरवठा मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या भेंगळ कारभारामुळे असे प्रकार होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.