एपीएमसी प्रवेशद्वारानजीक दुर्घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
परिसरात मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र ठेकेदारांची कामात होणारी दिरंगाई यामुळे सुंदर शहर बनविताना नागरिकांना मात्र असुंदर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याची प्रचिती मंगळवारी सायंकाळी एका ट्रक्टरचालकाला आली. रस्त्यावरील खड्डे चुकविताना त्याचे नियंत्रण सुटले आणि पाण्याचा टँकर कलंडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारासमोर घडली.
बेळगाव-कंग्राळी खुर्दच्या मुख्य रस्त्यामधील वेंगुर्ला क्रॉस ते शिवमूर्तीपासूनच्या रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात होऊन जवळपास वर्षाचा कालावधी होऊन गेला. मात्र अधिकाऱयांचा दुर्लक्षपणा आणि ठेकेदारांचा बेजबाबदारपणा यामुळे रस्ता आणि गटारीच्या कामाला बराच विलंब लावण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना अनेक समस्यांचा सामना करत वाहने चालवावी लागत आहेत. रस्ता कामाला बरीच दिरंगाई करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता कामाचे साहित्य, बऱयाच ठिकाणी रस्ता कामाची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच या रस्त्यासंबंधीत गावातील वाहतूक सकाळी आणि संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात होत असते. रस्त्याच्या पश्चिमेकडचा अर्धा भाग करण्यात आला आहे तर पूर्वेकडचा भाग अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजुने वाहतुकीचा ताण वाढत आहे. त्यातच ठिकठिकाणी रस्ता कामाचे साहित्य व रस्त्यावरील खड्डे यामुळे हा रस्ता फारच धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. परिणामी वाहनचालक आणि अनेक गावच्या ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱयांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सायंकाळी ही टँकर उलटल्याची घटना समजताच जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेला जबाबदार असणाऱया ठेकेदार आणि अधिकाऱयांना फोन करून याची कल्पना दिली आणि लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची सूचना केली..