लॉकडाऊनचा खतपुरवठय़ाला फटका, शेतकऱयांसमोर प्रश्न
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना लॉकडाऊनमुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱयांची मोठी परवड होताना दिसत आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱयांसाठी खते व बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा कृषी विभागस्तरावरून सर्व नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बियाण्यांची उपलब्धता मोठय़ा प्रमाणावर 6213.61 क्विंटल इतकी झाली. पण जिल्हय़ासाठी मागणी असलेल्या खतांच्या 20,250 मे.टना पैकी केवळ आतापर्यंत 4,541.81 मे.टन खत उपलब्ध झाल्याने हे खत किती शेतकऱयांना पुरवठा करताना कृषी विभागाच्या मर्यादा समोर आल्या आहेत.
खरीप हंगामासाठी जिल्ह्य़ातील शेतकऱयांना सुधारित व संकरित भातबियाणी तसेच आवश्यक असलेली खते वेळेत मिळण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कार्यवाही केली. खरीप हंगामासाठी जिल्ह्य़ासाठी महाबीजकडून सुधारीत 973.10 क्विं. बियाण्यांची आवक झाली त्यापैकी आतापर्यंत 768.12 क्विं. बियाण्यांची विक्री झाली. खाजगी कंपन्यांकडून मागणी केलेल्या 4199.52 क्विं. सुधारीत बियाण्याची उपलब्धता झाली. त्यापैकी 3398.53 क्विं. बियाण्याची विक्री झाली आहे. संकरीत बियाण्याची 667.61 क्विं. इतकी आवक झाली, त्यापैकी 474 क्विं. बियाणे विक्री शेतकऱयांकडून झाली.
कोकण कृषी विद्यापीठस्तरावरूनही शेतकऱयांसाठी 373.38 क्विं. बियाणे उपलब्ध झाले. त्यापैकी 370.38 क्विं. बियाण्यांची शेतकऱयांनी उचल केल्याचे सांगण्यात येते. मागणी केलेल्या बियाण्यांसाठी शेतकऱयांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. पण या हंगामातील शेतीसाठी आवश्यक असलेल्या खत पुरवठय़ाची स्थिती पाहता शेतकऱयांना खते मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. येथील शेतकरी मोठय़ा प्रमाणात युरीया व सुफला या खताची मागणी करतात. त्यानुसार कृषी विभागाकडून खताच्या मागणीचे नियोजन केले जाते. त्याप्रमाणे खत उपलब्ध होण्यासाठी संबधित कंपन्याकडे मागणी करण्यात येते.
पण या खत पुरवठय़ाच्या मागणीसमोर कोरोना लॉकडाऊनचा मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. परप्रांतीय मजूर गावी गेल्याने खत उतरवण्यासमोर प्रश्न उभा आहे. मजुर उपलब्ध होत नसल्याने खताचा पुरवठा होत नसल्याचे सांगितले जात आहे. प्रारंभाला अडीच हजार टनाची पहिली रेक रत्नागिरीत दाखल झाली होती. त्यानंतर रेक उतरण्यासाठी परप्रांतीय मजूरांच्या जागी स्थानिक स्तरावर मजूर उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाला आजही तारेरवरची कसरत करावी लागत आहे. त्यात रेल्वेद्वारे खतांची रॅक मजूरांच्या प्रश्नामुळे आलेली नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यात खत टंचाईचे संकट शेतकऱयांसमोर उभे राहिले आहे. जिल्ह्य़ासाठी आवश्यक असलेल्या 20,250 मे.टन खतापैकी 15 जूनपर्यंत 4,541.81 मे.टन इतकाच खतपुरवठा उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात उपलब्ध झालेल्या बियाण्यांच्या विक्रीचा प्रतिसादः
तालुका आवक विक्री शिल्लक
मंडणगड 75.37 75.37 0.00
दापोली 203.73 175.09 28.64
खेड 572.05 472.70 99.35
गुहागर 262.73 153.02 109.71
चिपळूण 1638 1464 174
संगमेश्वर 593.86 421.37 172.49
रत्नागिरी 1048.75 988.81 59.94
लांजा 511.12 403.89 107.23
राजापूर 1308 857.10 450.90
जिल्ह्य़ासाठी उपलब्ध झालेल्या खतांची आवक पुढीलप्रमाणेः
(मेट्रीक टन)
कंपनी खत उपलब्धता
आरसीएफ युरीया 2367.81
आरसीएफ 15:15:15 758
झुआरी युरीया 1373
झुआरी संपूर्णा 43