दोडामार्ग भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांची मागणी
कळणेतील घटनेला मायनिंग अधिकारी तेवढेच जबाबदार!
वार्ताहर / दोडामार्ग:
कळणे गावात सध्या मायनिंग मोठय़ा प्रमाणात चालते, याच मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील काही भाग कळणे मायनिंगच्या खाणीत कोसळला. परिणामी खाणीतील पाणी व चिखलमय माती परिसरातील शेती, लोकवस्तीत शिरले आहे. परिसरातील रस्ते पूर्णपणे चिखलमय झाल्यामुळे रस्त्यावरुन वाहने हाकणे त्रासदायक होत आहे. आज खाणीतील पाणी, चिखलमय माती म्हणजेच पूर्णत: कळणे मायनिंग परिसरातील शेती व लोकवस्तीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी स्पष्ट केले आहे. कळणेतील घटनेला जिल्हा खनिकर्म अधिकारी तेवढेच जबाबदार असून खनिकर्म अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत सत्ताधाऱयांनी दाखवावी, असे गवस यांनी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धपत्रकात गवस यांनी पुढे म्हटले आहे की, कळणे येथील लोकवस्तीत पाणी शिरल्याने बरेचसे नुकसान झाले. शासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करण्याचे सोपस्कार पूर्ण करून मलमपट्टी करण्याचे काम केले. मात्र, घरात शिरलेले पाणी व चिखल याकडे कोणीही लक्ष दिले नाही. भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती होण्याची टांगती तलवार अजूनही ग्रामस्थांच्या डोक्यावर आहे. लोकांच्या जमिनीत मातीचा भराव शिरल्याने जमिनी चिखलमय व विस्कळीत झाल्या आहेत. लाईटचे पोल पडले आहेत. विहिरीत चिखल साचल्याने पाणी प्रश्न आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून व एखाद्या मायनिंग अधिकाऱयाने थातुरमातुर उत्तरे देऊन हा प्रश्न निकालात काढण्यापेक्षा स्थानिक ग्रामस्थांच्या व्यथा समजून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. याकामी भाजप म्हणून आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत. त्यामुळे शासन नियमांचे उल्लंघन करून होत असलेले मायनिंग, त्यावर दुर्लक्ष करणारे मायनिंग अधिकारी व कार्यरत मायनिंग एजंट या सर्वांमुळे सदरील परिस्थिती उद्भवलेली असून त्याला हे सर्वजणच कारणीभूत आहेत. या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
पालकमंत्री ती हिंमत दाखवतील काय ?
कळणे गावात सध्या मायनिंग मोठय़ा प्रमाणात चालते याच मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील काही भाग कळणे मायनिंगच्या खाणीत कोसळला. परिणामी खाणीतील पाणी व चिखलमय माती परिसरातील शेती, लोकवस्तीत शिरले आहे. परिसरातील रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले. राज्य शासनाने कोरोनाचे नियम लावून सर्वसामान्य जनतेस घरी बसविले. त्यावेळी पावसाळय़ाच्या सुरुवातीला कळणे मायनिंग कंपनीची वाहतूक प्रशासनाच्या नजरेदेखत सुरू होती. दोडामार्ग मुख्य बाजारपेठेतून कळणे ते गोवा अशा मार्गाने होणाऱया वाहतुकीची पूर्ण कल्पना जिल्हा मायनिंग अधिकाऱयांना होती. मात्र, ते डोळे मिटून गप्प होते. वास्तविक पाहता जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांनी त्याचवेळी कंपनीच्या कार्यपद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे होते. ते न देणे याचाच अर्थ त्यांना सत्ताधारी पालकमंत्री, आमदार, खासदार यांचा मायनिंग कंपनीला वरदहस्त आहे, असे समजायचे का? त्यामुळे खरोखरच जर चौकशी करायची असेल तर आधी जिल्हा खनिकर्म अधिकाऱयांवर गुन्हा दाखल करण्याची हिंमत सत्ताधाऱयांनी दाखवावी, असे गवस यांनी पत्रकात म्हटले आहे.