कुडचडे, सावर्डे परिसरांतील लोकांकडून उठविला जाणारा प्रश्न, लॉकडाऊन असताना संमती दिल्याबद्दल नाराजी
प्रतिनिधी / कुडचडे
कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी लागू केलेला लॉकडाऊन चालत असताना कोणत्या दबावाखाली खनिजमालाच्या वाहतुकीला सरकारने परवानगी दिली आहे, असा प्रश्न कुडचडे, सावर्डे व इतर भागांतील लोकांकडून उपस्थित केला जाताना दिसू लागला आहे. अगोदरच खाणबंदीमुळे अडचणीत आलेले खाण अवलंबित लॉकडाऊन झाल्यामुळे संकटात सापडलेले आहेत. असे असताना त्यांच्याकडे लक्ष न देता सरकार आपली तिजोरी कशी भरेल यावर जास्त भर देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे लोकांचे म्हणणे आहे.
खाण व्यवसाय पूर्ववत सुरू होण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असून त्यांना त्यात थोडय़ा प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. पण लॉकडाऊन असताना निवडक कंपन्यांना मालवाहतुकीस परवानगी दिल्याबद्दल जनतेकडून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील सर्व ठिकाणी एकाच वेळी मालवाहतूक सुरू करण्यावर भर दिला असता, तर काही खाण अवलंबितांना यांचा फायदा झाला असता असे मत खाण अवलंबितांकडून व्यक्त होत आहे.
धूळ प्रदूषणामुळे लोकांना त्रास
सध्या सावर्डे परिसर सेझा गोवा वेदान्त, चौगुले व इतर खाण कंपन्यांच्या मालवाहतुकीमुळे प्रदूषित झालेला दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊन अंशतः शिथील केल्यामुळे काही प्रमाणात लोकांची ये-जा सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार प्रत्येक व्यक्ती तोंडाला मास्क बांधून आपल्या कामासाठी बाहेर निघत असली, तरी या मालवाहतुकीच्या धूळ प्रदुषणामुळे लोकांना त्रास होत असल्याचे व वाहतूक पोलिसांनाही त्याचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर ताबडतोब तोडगा काढावा, अशी मागणी लोकांकडून होत आहे.
मालवाहू ट्रकांच्या गर्दीमुळे अडचण
सरकारतर्फे मालवाहतूक करण्यासाठी परवानगी देताना ज्या अटी घालायला हव्या होत्या त्याप्रमाणे त्या घालण्यात आल्या नसल्याचे सावर्डे परिसरात दिसून येत आहे. एकाच वेळी किती तरी मालवाहू ट्रक रस्त्यावर दिसून येतात. तसेच सदर ट्रकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण कंपन्यांची रस्त्यावर कोणतीच व्यवस्था दिसून येत नाही. त्यामुळे टॅव्हल पास घेऊन जे लोक कामाला जातात त्यांची या मालवाहू ट्रकांमुळे बरीच अडचण होते. यातून अपघात होण्याची शक्यता दिसून येत आहे. या मुद्यावर सरकार मौन का बाळगून आहे त्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी जोरदार मागणी खाण अवलंबितांकडून होत आहे.