मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजपच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट कवितेतून उत्तर दिले आहे. ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’, असं शिर्षक असलेल्या या कवितेतून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपची फिरकी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर ही कविता शेअर केली आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांची कविता चांगलीच व्हायरल झाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्यास, मेणबत्या, दिवे पेटवण्यास सांगितले नाही. ते शांतपणे लढत आहेत. विरोधक मात्र कोरोना संकटातही मंदिर उघडा, बाजार उघडा असं सांगून रस्त्यावर उतरले होते, असं आव्हाड यांनी या कवितेत म्हणत भाजवर निशाणा साधाल आहे.
जितेंद्र आव्हाड काय आहे कविता?
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
ना कुठे बडबोलेपणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिकपणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोरगरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!
ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठसूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
– डॉ.जितेंद्र आव्हाड