फाटलेले गालिचे, जाजमे, सुतापासून बनलेल्या वस्तू, पायपुसणी इत्यादींचे करायचे काय? असा प्रश्न काही वेळेला पडतो. मात्र, गोरखपूर विश्वविद्यालयातील काही संशोधकांनी या टाकाऊ आणि खराब झालेल्या वस्तूंपासून टिकाऊ पॉलिमरची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. या पॉलिमरपासून टाईल्स तसेच उष्णता आणि ध्वनीविरोधी पत्रे व शिट्स तयार करता येतात.
गोरखपूर विश्वविद्यालयाच्या पंडित मदनमोहन मालवीय संशोधन शाळेचे हे तंत्र विकसित केले आहे. येथील प्राध्यापक डॉ. आर. के. वर्मा आणि त्यांचे साहाय्यक विद्यार्थी यांनी तीन वर्षांच्या संशोधनानंतर हे महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचे पेटंट मिळविण्याची त्यांची योजना आहे. यामुळे अनेक टाकाऊ वस्तूंचा निचरा करण्याची समस्या सुटणार आहे. या टाकाऊ वस्तूंपासून हे पॉलिमर बनत असल्याने त्याची किंमतही कमी राहणार असून ते उद्योजकांना कच्चा माल म्हणून सहजगत्या वापरता येणार आहे. नित्योपयोगी वस्तू या साधनापासून बनणार असल्याने प्रदूषणाची समस्याही काही प्रमाणात दूर होणार आहे. आता या पॉलिमरचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याची या संशोधन शाळेची योजना आहे.