मुंबई/प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय त्यांच्या नागपुरमधील घरावर देखील आज छापेमारी केली. या कारवाईनंतर विरोधी व सत्ताधारी पक्षतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान या कारवाईवरून भाजपा नेत्यांकडून महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी, “खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत, खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे नेमका कोण हे लवकरच उघड होईल…”असं म्हणत टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे, “सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला, हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून निवासस्थानासह १० ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे.” असे म्हंटले आहे.
खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण?
अतुल भातखळकर यांनी, “खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम. एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही.” असं देखील भातखळकर यांनी म्हणाले आहे.