विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी भेट घेतल्यानंतर दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील खलाशांचा विषय पंतप्रधान तसेच परराष्ट्रमंत्र्यांच्या नजसेस आणून देण्याचे तसेच हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याचे आश्वासन आपणास राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले आहे.
राज्यपाल मलिक यांनी गोव्यातील खलाशांबाबत जी काळजी दाखविली आहे त्याबद्दल आपण त्यांचा आभारी असून त्यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे मुख्यमंत्री तसेच गोव्यातील अनिवासी भारतीय आयुक्त यांनी यासंदर्भात उचलेल्या पावलांना बळकटी मिळेल, असे कामत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आपण गुरुवारी राज्यपालाची भेट घेऊन त्यांना जगभरात विखुरलेल्या गोमंतकीय खलांशाना गोव्यात परत आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. वैद्यकीय सुविधांच्या अभावी सदर खलाशांना कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्याकडेही त्यांचे लक्ष आपण वेधलेले आहे. राज्यपाल आता सकारात्मक पावले उचलतील, असा आशावाद कामत यांनी व्यक्त केला आहे.
100 खलाशांचे महाराष्ट्रात विलगीकरण नको : कुतिन्हो
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा मोठा प्रमाणात फैलाव झाला असून असे असताना सरकारने गोव्याच्या 100 खलाशांना महाराष्ट्रामध्ये विलगीकरणात ठेवण्याचे ठरविल्याबद्दल मडगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर निर्णय बदलून या खलाशांना गोव्यातच विलगीकरणात ठेवावे वा त्यांना सशुल्क विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.