राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिगंबर कामत यांना आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
मुंबई दोन बोटींवर अडकून पडलेल्या गोमंतकीय खलाशांच्या सुटकेबाबत काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालून गोव्यातील खलाशांना गोव्यात आणण्यास मदत करावी, अशी मागणी कामत यांनी केली. यावेळी राज्यपालांनीही या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.
या अगोदर आपण राज्यपालांना भेटून खलशांच्या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर गोव्यातील 60 खलशांना गोव्यात आणले गेले. आता कर्णिका व आंग्रिया या दोन बोटीवरील गोव्यातील खलाशी मुंबईत अडकून पडले आहेत. या खलाशांचे कुटुंबिय येऊन आपल्याला भेटले. जे खलाशी मुंबईत अडकून पडले आहेत त्यांच्याबाबत काहीच स्पष्ट होत नाही. गोवा सरकार त्यांना गोव्यात आणल्यानंतर विलगीकरण सेवा उपलब्ध करण्याबाबत स्पष्टीकरण देतात. मात्र हे खलाशी गोव्यात कधी पोचतील हे स्पष्ट होत नाही. डीजी शिपिंग आणि या बोटी दरम्यान नेमके काय घडले आहे हेही स्पष्ट होत नाही. त्यामुळे आता आपण राज्यपालांना भेटून त्यांना लक्ष घालण्याची विनंती केल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेता या नात्याने आपली ही जबाबदारी आहे. या अगोदर राज्याच्या मुख्य सचिवांशीही आपण चर्चा केली. गोवा सरकार म्हणते त्यांना गोव्यात आणल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. त्यामुळे या खलाशांना गोव्यात आणण्याबाबतच्या विषयाला स्पष्टता मिळत नाही. या बोटीवरील युक्रेनच्या खलाशाला सोडण्यात आले. मग गोव्याच्या खलाशाबाबत नेमका निर्णय का होत नाही, असेही ते म्हणाले. आता या प्रकरणी राज्यपालांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
क्वारन्टाईनसाठी पैसे आकारले जाऊ नये
गोवा सरकार गोव्यातील लोकांना क्वारन्टाईन करण्यासाठी पैसे आकारत नाही. खलाशी हेही गोयकारच आहेत. यामुळे त्यांच्याकडूनही क्वारन्टाईन करण्यासाठी पैसे आकारले जाऊ नयेत. मागील दोन महिने त्यांना पगार मिळालेला नाही. त्याचबरोबर कंपन्यांकडून पैसे भरून घेतल्यास उद्या या कंपन्या त्यांना पुन्हा नोकरीत घेणार नाहीत. त्यामुळे या विषयावरही विचार करण्याची गरज आहे, असेही कामत यांनी सांगितले.