गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया : खलाशी, त्यांचे कुटुंबीय व संघटनेच्या नैतिक दबावाला श्रेय
प्रतिनिधी / मडगाव
खलाशांना आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाला जात नसून खलाशी, त्यांचे कुटुंबीय व खलाशी संघटना यांच्या सरकारवरील नैतिक दबावाला त्याचे श्रेय जाते. आतापर्यंत 5 टक्केच युद्ध जिंकले असून 95 टक्के विजय बाकी आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
खलाशी व त्यांचे कुटुंबीय, खलाशांची संघटना, बिगरसरकारी संघटना व नागरिकांकडून सरकारवर जहाजांवरील खलाशांना परत आणण्यासाठी नैतिक दबाव वाढल्याने हे शक्मय झाले आहे. राजकारण्यांनी त्याचे श्रेय घेणे योग्य नाही, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी तत्काळ श्रेय घेतल्याने त्यांच्यावर सरदेसाई यांनी यावेळी चौफेर टीका केली. आलेमाव यांनी सर्वांचे आभार मानले. मात्र स्वतःच्या पक्षाचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्षांचे आभार मानण्यास ते विसरले. आलेमाव यांना आपण सध्या कोणत्या पक्षात आहे याचा विसर पडला आहे, असा टोला सरदेसाई यांनी हाणला.
भाजप चर्चिलना आपल्याविरोधात वापरतो
आपण भाजप सरकारवर टीका करत असल्याबद्दल राष्ट्रवादीचा हा आमदार आक्षेप घेतो. कारण भाजप आपल्याविरोधात बोलण्यास त्यांना वापरत आहे. त्यासाठी तशी कारणे आहेत. चर्चिल यांच्या कुटुंबियांच्या फुटबॉल क्लबला तसा सरकारचा मोबदला मिळतो. आतापर्यंत 6.5 कोटी त्यांना फेडण्यात आलेले आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
चर्चिलनी बिथरून जाण्याचे कारण नाही
आपण भाजपाची संगत धरून होतो अशी टीका आलेमाव यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्याला स्थिर व विकासशील सरकार देण्यासाठी आपण स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापित केले होते. आपला पक्ष त्याचे कदापि खंडन करत नाही. सरकारात असताना आपण शंभर टक्के भूमिका देण्याचा प्रयत्न केला व विरोधात असताना शंभर टक्के भूमिका देण्यात येत आहे. आता सरकारला अनपेक्षित प्रश्न विचारले जात असल्याबद्दल चर्चिलनी बिथरून जाण्याची गरज नाही, असे सरदेसाई म्हणाले.
…तर श्रीपाद नाईक यांचे नाव घेता येईल
कोणा राजकारण्याचे नाव घ्यायचे असल्यास आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे नाव घेता येईल. त्यांनी राज्यात बसून नव्हे, तर दिल्लीत ये-जा करून गृहखाते, जहाज उद्योग खाते व अन्य संबधितांशी खलाशांना परत आणण्याचा विषय लावून धरल्याने हे शक्मय झाल्याचे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.