प्रतिनिधी / व्हनाळी
महापूर आणि परतीच्या पावसाने थैमान घातल्याने सुगी बरीच पुढे गेली. त्यात पैरा पद्धतीमुळे मजूर मिळेनात, अशी अवस्था आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरच्याच मनुष्यबळावर मळणीचा आधार घेतला आहे. पारंपरिक खळ्यावरच्या मळण्या कालबाह्य झाल्यामुळे खाटावरच्या झोडणीवर जोर दिला जात आसून भातमळणी आता रसत्यावरच करण्याकडे शेतक-यांचा वाढता कल दिसत आहे. एकविसाव्या शतकात जवळपास सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा वापर कृषी क्षेत्रातही केला जात असून आता प्रतिष्ठीत शेतकऱ्यांबरोबर सामान्य शेतकरीही आता आधुनिक कृषी तंत्रज्ञानचा वापर करू लागल्याने पारंपरिक मशागतीच्या पध्दती दुर्मिळ होत चालल्या आहेत.
भारतात उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन ऋतूमध्ये भात हे मुख्य पिक घेतले जाते. पुर्वी भात पिकांची मळणीसाठी खळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. खळ्यावर मध्यभागी एक लाकडी दांडा ठोकून त्या भोवताली बैलांना फिरवून भाताची मळणी केली जात होती. आता त्याची जागा ट्रॅक्टर व अधुनिक मळणी मशीनने घेतली असली तरी अजूनही दुर्गम भागातील शेतकरी भाताची मळणी करण्यासाठी पारंपारिक पध्दतीचा वापर करतांना दिसून येतात.
जनावरांच्या शेणाने खळ्याची सारवण करून त्यावर कापणी केलेले भात पसरवले जातात. चार-पाच बैलांची दावण तयार करून त्यावरून फिरवतात. नंतर वा-याच्या दिशेचा वेध घेऊन धान्य उपणणी केली जाते. त्यामुळे कमी खर्चात व सुरक्षित मळणी होत असली तरी शेतकऱ्यांना यामध्ये अधिक कष्ट करावे लागत होते. आता नवतंत्रज्ञान जरी विकसीत झाले असले तरी खळ्यावरील मळणीची सर ह्या रस्त्यावरील मळणीला येत नाही. परिणामी जागेचा अभाव व पावसात मजुरांची होणारी टंचाई शिवाय दररोजचा होणारा उन पावसाचा खेळखंडोबा यामुळे बहुतांशी भातमळण्या यंदा रस्त्यावरच सूरू असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
बैल, रोळच्या मदतीने आधी व्हायची मळणी
यंदा महापूर व परतीच्या पावसाने अक्षरशः शेती व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. पावसाच्या या आसमानी संकटामुळे शेती कामे पुढे ढकलली गेली. यामध्ये प्रामुख्याने सुगीतील भातमळणीला खोळंबा बसला. पूर्वी भातकापणी करून मोठाल्या खळ्यावर कापलेले भात गोलाकार रचले जायचे. मग दोन-चार दिवसांनी पहाटे वा सायंकाळी बैल व दगडी रोळने पुरुष गडीमाणसाद्वारे मळणी काढली जात होती. कालौघात बैलांच्या संख्येत घट होऊ लागली अन् ट्रॅक्टर अथवा मळणी मशिनद्वारे मळण्या होऊ लागल्या. याही कमी कमी होत गेल्या. त्यानंतर लाकडी खाटावरच्या झोडण्यांना बळ आले. अलीकडे खाटावरच्या मळण्याच सर्वत्र पाहायला मिळत आहेत.