प्रतिनिधी /सातारा
पावसाळय़ाची चाहुल लागता मासळी बाजारात ही विविध प्रकाराच्या मासळी विक्रीस दाखल होतात. या दरम्यान मासळी ही उत्तम दर्जाची मिळत असल्याने सध्या अनेक खवय्यांची पावले ही मासळी बाजारात फिरताना दिसत आहेत. या मासळीच्या दरात जरी वाढ झाली तरी ग्राहकांची मागणी ही तितक्याच प्रमाणात वाढली आहे. सुरमई, वाम, कोळंबी सारख्या मासळी प्रकारांना ग्राहकांची अधिक पसंती देण्यात येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कित्तेक नागरिक हे केवळ नदिच्याच मासळींना अधिक पसंती देत असल्याने, बाजार पेठेत नदिच्या मासळींचा शोध घेऊन त्याची खरेदी करतात. त्यातच आत्ता आषाढ महिना सुरू झाल्याने या मासळी बाजारात खरेदीला चांगलेच उधान आले आहे. त्यामुळे अगदी सकाळ पासुन हे विक्रेते आपला माल घेऊन बाजार पेठेत ठाण मांडुन बसलेले दिसत आहेत. येथील वाडेफाटा व शहरातील मुख्य बाजार पेठेत हे विक्रेते आपला माल विक्री करताना दिसत आहेत.
सध्या बाजार पेठेत विक्रीस असलेले दर प्रतिकिलो प्रमाणे-बोंबील-280 रूपये, पॉपलेट-1000 ते 800 रूपये, बांगडा-300 रूपये, सिलन मासा (नदिचा)-160 रूपये, मांदिली-200 रूपये, वाम-400 रूपये, कोळंबी ही दोन प्रकारातील विक्रीअसुन-560 व 520 रूपये, चिलापी-200 रूपये, मरज-500 रूपये प्रमाणे विक्री करण्यात येत आहे.
खेकडय़ांची आवक ही वाढली
यंदा खेकडय़ांची आवक ही वाढली असल्याने सध्या लहान, मोठय़ा आकारातील जिवंत खेकडे हे विक्रीस दाखल झाले आहेत. सध्या 200 रूपये प्रती किलो दराने याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या खवय्ये खेकडय़ांच्या पदार्थांवर चांगलाच ताव मारित आहेत. कित्तेक महिला वर्गांना हे खेकडे सोलने अवघड जात असल्याने ते संबंधीत विक्रेत्यांकडुनच सोलुन घेताना दिसत आहेत.