चिपळूण
खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याकरिता वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील राज्यातील सात तज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या विश्वास उर्फ भाऊ काटदरे यांचा समावेश आहे.
राज्यपालाच्या आदेशानुसार महसूल व वन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी सिध्देश सावर्डेकर यांनी या समितीच्या नियुक्तीचे पत्र जाहीर केले आहे. या समितीमध्ये पुणे येथील वन संरक्षक रमेश कुमार, सातारा वन विभागाचे उपवन संरक्षक डॉ. बी.एस. हाडा, रत्नागिरी वनविभाग चिपळूणचे उपवन संरक्षक दिपक खाडे, एनआयडीयुएसचे संस्थापक संचालक डॉ. वरद गिरी, सेंट्रल इंडिया, वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे संचालक नितिन देसाई, साताऱयाचे माजी वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह काटदरे या सातजणाचा समावेश आहे.
खवले मांजर ही एक महत्वाची प्रजाती असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत अनुसूची 1 मध्ये या प्रजातीचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रजाती महाराष्ट्रातील वनक्षेत्रात मोठय़ाप्रमाणात आढळून येते. मात्र विविध कारणामध्ये प्रजातीच्या अधिवासाला धोके निर्माण होत आहेत. तसेच खवले मांजराची शिकार हाऊन यामध्ये संघटीत गुन्हेगारीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करत 7 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीचे संवर्धन व संरक्षण करण्याकरिता उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मांडले होते. त्यानुसार अधिवास व व्यवस्थापन गुन्हेगारीला आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती करणे आदी बाबांचा विचार करुन खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ञांना समाविष्ट करुन वरील सातजणांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
ही समिती खवले मांजर प्रजातीचे पर्यावरण शास्त्र, अस्तित्व व त्यांना असलेल्या धोक्यांचा अभ्यास करणार आहे. खवले मांजराच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास व राज्यातील अवैध व्यापाऱयाला आळा घालण्यासाठी संभावित क्षेत्राची निवड करणार आहे. खवले मांजराच्या अधिवास व्यवस्थापनासाठी तसेच संवर्धनासाठी शिकारीला आळा घालण्यासाठी संरक्षण उपाययोजना सुचवणार आहेत.
2015पासून खवले मांजर संरक्षणाचे काम हाती- काटदरे
यासंदर्भात भाऊ काटदरे यांची भेट घेतली असता ते म्हणाले, 2015 साली पकडण्यात आलेल्या तस्करीतून खवले मांजर प्रजाती धोक्यात आल्याचे लक्षात आले आहे. यातूनच सह्याद्री निसर्ग मित्रने 2015 साली वनविभागाच्या मार्गदर्शन व सहकार्याने खवले मांजर संरक्षण आणि संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. याची दखल घेऊनच आपली या समितीवर निवड करण्यात आल्याचे भाऊ काटदरे यांनी सांगितले. तसेच या समितीची पुढील आठवडय़ात बैठक होणार असून यामध्ये खवले मांजर संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.