प्रतिनिधी/ कराड
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीमध्ये खवल्या मांजर प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याकरिता वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव संशोधन व वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ञांना समाविष्ट करून तांत्रिक अभ्यासगट स्थापन केला आहे. खवल्या मांजराची वाढती शिकार व तस्करी रोखण्यासाठी हा अभ्यासगट उपाययोजना सुचवणार आहे. यात सातारा जिल्हय़ातून डॉ. भारतसिंह हाडा सातारा उपवनसंरक्षक (प्रादेशिक) हे सचिव आहेत. तर मा. वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचीही निवड झाली आहे.
या अभ्यासगटाचे अध्यक्ष रमेश कुमार-वनसंरक्षक (वन्यजीव), पुणे हे असून दीपक खाडे – उपवनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी वन विभाग- चिपळूण, विश्वास काटदरे चिपळूण राज्य वन्यजीव मांडळ सदस्य, डॉ. वरद गिरी पुणे, नितीन देसाई, संचालक, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या सर्वांची तांत्रिक समितीवर निवड महाराष्ट्र शासनाने केली आहे.
गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि जिवंत तस्करीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यास वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच खवल्या मांजरांचा यादृष्टीने अभ्यास होईल.
खवले मांजर (इंग्रजीमध्ये भारतीय पेंगोलीन; शास्त्राsक्त नाव-मानीस क्रासीकाऊडाटा) ही एक महत्वाची प्रजाती असून वन्यजीव सांरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत अनुसूची – 1 मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. सद्या खवल्या मांजरीची शिकार ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. खवले मिळवण्याकरिता त्यांची शिकार केली जाते. यात संघटित गुन्हेगारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. राज्य वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीत मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीचे संवर्धन करण्याकरिता उपाययोजना आवश्यक असल्याचे मत मांडले होते.
अंधश्रद्धेमुळे खवल्या मांजराची शिकार होते, पारंपरिक चिनी औषधे, तर काही ठिकाणी खाण्यासाठी मांस व खवल्यांचा वापर केला जातो. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात वीसहून अधिक खवल्या मांजराच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या काही वर्षात खवल्या मांजराची शिकार आणि जिवंत तस्करीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यावर अभ्यासगट नेमून कृती आराखडा करण्यास वनखात्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच खवल्या मांजरांचा यादृष्टीने अभ्यास होईल.