प्रतिनिधी/ खंडाळा
सलग सुट्टय़ांमुळे वाढलेली वाहतूक व खांबाटकी घाटात रखडलेल्या रस्त्या रुंदीकरणाच्या कामामुळे शनिवारी घाटात वाहतूक संथगतीने सुरू होती. त्यातच सीएनजी वाहने घाटामध्येच बंद पडू लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर घाटात सुमारे दीडशे कार बंद पडल्या होत्या. पोलिसांनी पेनच्या सहाय्याने बंद पडलेल्या कार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली असली तरी वाहनचालक व प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप झाला. दुपारी दोन नंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाला.
शनिवारपासून सलग सुट्टय़ामुळे महामार्गावरून सातारा बाजूकडे जाणाऱया चाकरमानी- पर्यटकांच्या वाहनांची संख्या अधिक होती. खंडाळ्यानजीक असणाऱया खांबाटकी घाटाचे रुंदीकरण झाले आहे. मात्र खामजाई व दत्तमंदिराजवळ थोडय़ा अंतरात रस्ता रुंदीकरणाचे काम बाकी आहे. त्यामुळे या ठिकाणी एका वेळी दोनच वाहने मार्गस्थ होवू शकतात. मात्र या मार्गावर शनिवारी दिवसभर वाहनांची वर्दळ अधिक होती. अरूंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे सुमारे दीडशे ते पावणे दोनशे कार रस्त्यावर बंद पडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वाहन चालकांच्या रखडपट्टीने घाटात सुमारे पाच तास वाहतूक संथगतीने सुरू होती.
दरम्यान, घाटरस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी सुमारे दिड तास बोगदा मार्गे वाहतुक वळविण्यात आली होती. बंद पडलेल्या कार दहा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करित दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळ्याचे पोलिस निरिक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विठ्ठल पवार, सचिन वीर, सुरेश मोरे, होमगार्ड सोमनाथ धायगुडे, सुनील वेळे, महामार्ग पोलीस यांनी वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.