बेळगाव बाजारात खायच्या पानांच्या दरात वाढ
अरुण टुमरी/ काकती
बेळगाव बाजारात खायच्या पानांना मागणी वाढली असून महिन्याभरात भाव चांगलाच वधारत चालला आहे. सध्या बाजारात पानांच्या गुणवत्तेनुसार 40, 50 ते 60 रुपये असा 100 पानांचा भाव चालला आहे. यामुळे पान खाणाऱयांना व लग्न सराई, धार्मिक कामासाठी वापरणाऱया ग्राहकांना महागाईचा अनुभव येऊ लागला आहे. पानमळा उत्पादक शेतकऱयांना वाढत चाललेला भाव मिळत असल्याने शेतकरी खुश झाला आहे.
बेळगावच्या घाऊक बाजारात चिक्कोडी, जैनापूर, विजापूर, कुडगी येथून सध्या खाऊच्या पानांची आवक होत आहे. महिन्याभरात भाव वाढत चालले आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात 100 पानांचा दर 22 ते 30 पर्यंत किरकोळ बाजारात होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात विजापूर जिल्हय़ातील कुडगी व आंध्र प्रदेश येथून मोठय़ा प्रमाणात खायच्या पानांची आवक मागणीपेक्षा अधिक वाढली आहे.
त्यावेळी अवकाळी पावसाचा फटका बसला होता. परिणामी पानमळ्यात मूळ कुजणाऱया रोगामुळे पान वेलीची मुळे कुजत होती. परिणामी पाने पिवळी होऊन गळून पडत होती. त्यानंतर कोरोना संकटाच्या महामारी संसर्गाने पानांना मागणी नव्हती. परिणामी जागच्या जागी पाने गळून कुजत होती. आता परिस्थिती सुधारणा झाल्याचे जाणवत आहे.
उत्पादन खर्च वाढला तरी पानमळा उत्पन्नात वाढ
पानमळ्याला लागवडीपूर्वी मशागत, वाफ्यात शेवगा व शेवटी पिकाची लागवड यासाठी एकरी 37 हजार रुपये खर्च येतो. दोन महिन्यानंतर वेलीची लावगड करण्यात येते. 12 ते 14 रुपये प्रतिवेल याप्रमाणे एकरी सात हजार वेली लागतात. पहिली पानवेल बांधणी तीन महिन्यांनी, दुसरी प्रति दोन महिन्याला अशी वर्षाकाठी 7 ते 8 बांधणी करावी लागते. प्रतिवेल 12 ते 15 रुपये येतो. त्यानुसार 70 ते 80 हजार रुपये खर्च पानवेल बांधणीसाठी येतो. शेणखत व सुक्ष्म सेंद्रिय खते 45 हजार, तोडणी व प्रतिडाग बांधणी रुपये 500 खर्च येतो. असा एकूण सव्वा दोन ते अडीच लाख सरासरी खर्च येतो. सर्व खर्च वजावट करता तीन लाखाचे उत्पन्न मिळते. गेल्या जवळपास दहा महिन्यात पानमळा व्यवसाय तोटय़ात गेला आहे. यावर्षी 2021 नववर्षापासून पानांना भाव मिळत असल्याने पानमळ्यांना तेजीचे दिवस येतील असे पान उत्पादक शेतकऱयांतून बोलले जात आहे. तर पान व्यापारी गुलाब पानवाले यांच्या मते पानांना मागणी वाढत असून यंदा पानाचा भाव वधारेल, आंध्र प्रदेशातून मोठी आवक वाढल्यास भावात परिणाम घसरलेला दिसून येईल मात्र लाग्नसराईत दुप्पटीने मागणी यंदा वाढणार असल्याने खायच्या पानाचा भाव तेजीत राहील असे ‘तरुण भारत’शी बोलताना पान व्यापाऱयांनी सांगितले.
पानमळ्यांना नवे वर्ष आर्थिक समृद्धी देईल
दरवर्षी पानमळा शेतकरी मकर संक्रांतीनंतर मळ्यात मोठय़ा प्रमाणात खोडणी करत असतो. मात्र गेल्या वर्षी अपवाद होता. मात्र या वर्षी पानाची खोडणी पंधरा दिवसांनी नियमित होणार आहे. सध्या पानाच्या एका डागाला (सहा हजार पाने) पंधरोश ते साडेतीन हजार रुपये भाव आहे. फाफडा पान प्रतिडाग 1500 ते 4000 रुपये पर्यंत प्रतवारीनुसार मिळत आहेत. परिणामी उत्पादन खर्चासह तोडणी, वाहतूक, पॅकिंग आदी खर्चाचा ताळमेळ बसत असल्याने पानमळ्यांना नवे वर्ष आर्थिक समृद्धी मिळवून देईल.