ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख पेक्षा अधिक असून आता पर्यंत 3 हजार पेक्षा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी 4,500 रुपये आकारले जात होते. मात्र ही किंमत सामान्य जनतेला परवड नसल्याने हे दर रद्द करून नवीन दर आकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते.
दरम्यान, खाजगी लॅब आणि महाराष्ट्र सरकार यांच्या मधील चर्चेनंतर शनिवारी खाजगी लॅब मधील कोरोना चाचणीचे दर जवळपास निम्म्याने कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे आता सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
या निर्णयामुळे आता खाजगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केवळ 2 हजार 200 रुपयांमध्ये केली जाणार आहे. तर घरातून चाचणीचे नमुने घेऊन जाण्यासाठी 2 हजार 800 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी या चाचणीसाठी अनुक्रमे 4,500 आणि 5,200 रुपये खर्च येत होता.
तसेच या निर्णयानंतर देखील खाजगी लॅब कडून अधिक दर आकारला गेल्यास संबधित लॅब वर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले आकारण्यात आलेले नवीन दर हे संपूर्ण देशातील कमी दर आहेत.
महाराष्ट्रात सध्या 92 लॅब असून लवकरच अजून चार ते पाच लॅब सुरू होणार आहेत. तसेच मागील आठवड्यात खाजगी लॅब द्वारे केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन केली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता.