वारणानगर / प्रतिनिधी
कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खाजगी,भिशी-सावकारी थांबवणे बाबत शिवसेना निवेदन दिल्यावर कोडोली पोलीसानी खाजगी सावकारी बाबत तक्रार देण्यास नागरिकानी पुढे यावे असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यानी केले आहे.
कोडोली शहर शिवसेनेचे विरेद्र पाटील, अंकुश रोकडे सजय निकम इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने कोडोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कोडोलीसह अनेक गावात खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाजगी फायनान्स कंपन्या भिशीच्या स्वरूपात कर्ज वाटून आठवड्याला पठाणी व्याजासह हप्ता वसूल करीत असून अशा खाजगी कंपन्यावर त्याचे आर्थिक व्यवहार तपासून कारवाई व्हावी. तसेच खाजगी सावकार देखील मोठ्या प्रमाणात व्याजाने वसुली करीत आहेत पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष असल्याचे निवेदन कोडोली पोलीसाना दिले होते. याची गंभीर दखल पोलीसानी घेतली आहे.
खाजगी सावकाराच्या पाशात अडकलेल्या काही व्यक्तीनी मा. जिल्हा पोलीस प्रमुख यांचेकडे तक्रार दाखल केली आहे त्याचा तपास अजून सुरू आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे आर्थिक मंदी आहे गोरगरीब सर्वसामान्य जनतेला रोजगार किंवा अन्य मार्गाने आर्थिक उत्पन्न घटले असून महागाई दिवसे दिवस वाढत चालली आहे. अशा परस्थितीत बँका पतसंस्था देखील कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत यामुळे खाजगी भिशी व सावकार यांच्या कडून मोठ्या प्रमाणात चढ्या व्याजाने कर्ज दिले आहे गावो गावी असे सावकार फोफावलेले आहेत.
खाजगी सावकारीत सर्व अडकलेल्या जनतेला सावकारा विरोधात तक्रार द्यायचे साहस राहिलेले नाही त्यामुळे यामध्ये अडकलेले लोक तक्रार द्यायला पुढे येत नाहीत याची दखल घेवून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली होती. प्रत्येक गावातील पोलीस पाटील, पोलीस ठाण्याचे बीट अमंलदार व गोपनीय पोलीसा मार्फत खाजगी कंपन्या व सावकार यांची नावे निश्चित करावीत त्याच्या कडून झालेला कर्ज पुरवठा व जमा करीत असलेले व्याज या सर्व व्यवहाराची आर्थिक तपासणी करून संकटात सावकारीत अडकलेल्या जनतेला यातून सोडवावे अशी विनंती विरेंद्र पाटील यानी केली होती.
कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांना याबाबत विचारले असता आजवर खाजगी सावकारी विरोधात तक्रार कोणी दिलेली नाही असे सांगून जे नागरिक सावकारी विरोधात तक्रार देतील त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल तसेच त्यांना तक्रार दिलेवर असुरक्षित वाटत असेलतर पोलीस संरक्षण करतील असे सांगीतले.
पोलीसांना तक्रार मिळाल्या शिवाय खाजगी सावकार सापडणार नाहीत त्यामुळे नागरिकानी निर्भयपणे तक्रार देणे गरजेचे आहे तसेच अनेक व्यावसायीकांना अनेक संघटना सभा समारंभ उत्सवाचे निमीत्त करून देणगी मागतात त्यामुळे अशा संघटना बाबत कोण व्यावसायीक तक्रार द्यायला आलाच तर अशा संघटना विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचे स.पो.नि. डोईजड यानी सांगीतले.