सांगरूळ /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील खाटांगळे येथील शासनाच्या रेशन धान्य दुकान चालकाकडून लाभार्थ्यांची नियमापेक्षा कमी धान्य देऊन फसवणूक केली जात आहे. या धान्य दुकानदाराच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राम दक्षता समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
खाटांगळेयेथे शासनाची रेशन धान्य दुकान असून या दुकानाचा चालक नागरिकांना धान्य देत असताना ऑनलाइन अगर छापील अशी कोणती ही अधिकृत पावती न देता साध्या कागदावर पेनने लिहून पावती देत आहे . लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या नावे ऑनलाईन नोंदणी असलेल्या धान्य मंजुरी प्रमाणे धान्य न देता लोकांची लुबाडणूक करत आहे .ऑनलाईन नावे नोंद असणाऱ्या मयत लोकांचे धान्य स्वतः हडप करत असून या दुकान चालकाचा गेली चार-पाच वर्षे हा भ्रष्टाचार सुरू आहे. मोफत धान्य वितरणामध्ये सुद्धा त्याने लोकांची फसवणूक केली असून यामध्येही मोठा भ्रष्टाचार केला आहे . या दुकानदाराने यापूर्वी आम्हाला कधीही धान्याची ऑनलाईन पावती दिलेली नाही. तसेच रेशन दुकानातून मिळणारी तूरडाळ आम्हाला कधीच दिलेली नाही अशी तक्रारही काही नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली असल्याची माहिती सरपंच दिपाली गुरव यांनी दिली.
शासनाच्या नियमानुसार दुकानात दर फलक लावलेला नाही. धान्य विक्रीही जादा दराने केली जात आहे. तक्रार बुकाची नागरिकांनी मागणी केली असता नागरीकरणा उद्धटपणे वागणूक देऊन धमकावण्याचा प्रयत्न हा दुकानदार करत असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समितीच्या वतीने सरपंच दिपाली गुरव, उपसरपंच सरदार पाटील, पोलीस पाटील राजाराम गुरव , रवींद्र केरबा पाटील यांनी करवीरचे तहसिलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर, ग्राम विकास मंत्री, तसेच तालुका पुरवठा अधिकारी करवीर यांनाही दिली आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, निवृत्ती पाटील, वैशाली भरत पाटील, उमा पाटील, वैशाली कृष्णात पाटील , माधुरी कांबळे, सरिता सुतार उपस्थित होते.