वार्ताहर / सांगरुळ
करवीर तालुक्यातील खाटांगळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या माघारीच्या मुदतीनंतर ९ जागांसाठी ९ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामस्थांनी निवडणुकीपेक्षा ग्रामदैवत विठ्ठलाई देवीच्या मंदिराच्या बांधकामाच्या कामास प्राधान्य देत मंदिराच्या कामात गावाची एकजूट रहावी यासाठी निवडणूक बिनविरोध केली.
खाटांगळेचे जागृत ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीचे मंदिर बांधकाम सुरू आहे. सर्व गावकरी एकत्र येऊन हे काम करत आहेत. गावात एकीचे वातावरणात सर्व कामकाज सुरू आहे. मंदिर बांधकामाचे प्रस्तावित काम एक ते दीड कोटी रुपये खर्चाचे आहे. निवडणुकीमुळे हेवेदावे वाढून मंदिराच्या बांधकामाच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी हा निर्णय सर्व गावकरी मंडळीनी घेतला आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने पैशाचा व वेळेचा होणारा अपव्यय टाळला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली म्हणून बक्षीस म्हणून चाळीस-पन्नास लाख रुपये विद्यमान आमदार यांनी जाहीर करावे. अशी अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणे कामी गावातील सर्व तरूण मंडळी, सर्व संस्था, सर्व आजी माजी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले. विठ्ठलाई मंदिरात गुलाल लाऊन, शपथ घेउन आणि गाऱ्हाणे घालून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील वातावरण शांत व आनंदी आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
बिनविरोध निवड झालेले प्रभाग नुसार सदस्य पुढीलप्रमाणे :
प्रभाग क्रमांक एक – रेश्मा सागर पाटील, प्रसाद नामदेव परीट, सतीश दिनकर नाईक
प्रभाग क्रमांक दोन – सखुबाई संभाजी पाटील, तृप्ती सागर पवार, एकनाथ पांडुरंग पाटील
प्रभाग क्रमांक तीन – उषा संभाजी पाटील, रूपाली अमर परीट, तुकाराम गणू पाटील