किसान संघर्ष समन्वय समितीची मागणी
शेतकरी आंदोलननाबाबत अवमानकारक उद्गार काढल्याप्रकरणी निषेध
प्रतिनिधी / मिरज
नव्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात देशव्यापी आंदोलन छेडणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांबाबत भाजपा नेत्यांनी अवमानकारक वक्तव्य केले आहे. आम. सुरेश खाडे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिटमार आणि दलालांचे आंदोलन संबोधल्याने त्यांच्या विरोधात किसान संघर्ष समन्वय समितीने बुधवारी निदर्शने केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार सुरेश खाडे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
गेली अठरा दिवस लाखो शेतकरी कृषी विधेयके रद्द करा म्हणून आंदोलन करत आहेत. मात्र सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलकांना अतिरेकी ठरविण्याचा उद्योग करत आहे. अन्नदात्या शेतकऱ्यांची बदनामी करण्याचे पाप भाजपा नेते करीत आहेत, असा आरोप यावेळी आंदोलनकर्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. आमदार सुरेश खाडे आणि रावसाहेब दानवे यांनी यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला.