जलस्रोत खाते जबाबदारी घेण्यास असमर्थ : शिरोडकर
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील ज्या खनिज खंदकांमध्ये पाणी तुंबलेले आहे, त्याचा विसर्ग करण्यासाठी ज्यांनी यापूर्वी इथे खनिज उद्योग चालविला होता त्या कंपन्यांना सरकारने पंप बसवून पाण्याचा निचरा करण्यास सांगितलेला आहे. जलस्रोत खाते या सर्वांची जबाबदारी घेऊ शकणार नाही, असेही कळवले आहे.
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी वरील माहिती पत्रकारांना दिली.
… तर घरांना मोठा धोका संभवतो
शिरोडकर म्हणाले की, मुख्य सचिवांनी यासंदर्भात संबंधित खाण चालकांबरोबर तसेच जलस्रोत अधिकाऱयांबरोबर बैठक घेतलेली आहे. जलस्रोत खाते सर्व खाण खंदकांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकत नाही. अलिकडेच चार ते पाच दिवस जोरदार पाऊस पडल्यानंतर खंदकांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. ऐन पावसाळ्य़ात ही खंदके भरुन वाहण्याची भीती आहे. त्यातून खंदकाच्या एखाद्या बाजूने पाणी वाहून जाताना जर तो भाग कोसळला तर पाणी वाहून जाणाऱया भागातील घरांना मोठा धोका संभवतो, असेही ते म्हणाले.
गोवा सरकारने राज्यातील सर्व खाण चालकांना ते ज्या भागातील लीज करारानुसार खनिज मालाचे उत्खनन करीत होते त्या भागातील यंत्रणा दि. 6 जूनपर्यंत काढून नेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे पालन म्हणून काही खाण चालकांनी खनिज खंदकांवर बसविलेल्या पंपाना अगोदर हात घातला आणि हे पंप काढून टाकण्याचे काम चालू केले. पावसाळ्य़ात हे खंदक भरुन पाणी वाहून जाऊ नये या करिता हे पंप वारंवार चालू करुन त्यातील पाण्याचा निचरा केला जात आहे. पंप काढून टाकल्यामुळे पाण्याच्या निचऱया अभावी पावसाळ्य़ात खंदक फुटून जाण्याची भीती आहे.
काही खाणचालकांना विनंती मान्य
मुख्य़मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन मुख्य सचिवांना बैठक घेण्यास सांगितले. मुख्य़मंत्र्यांनी खाण चालकांना बोलावून किमान खाणींवरील खंदकांवर लावलेले पाणी खेचण्याचे पंप काढू नका, अशी विनंती केली. त्यानुसार काही खाणचालकांनी सरकारची विनंती मान्य केल्याचे वृत्त आहे.