प्रतिनिधी/ पणजी
म्हादई आणि खाणबंदी या दोन विषयावर गोव्यातील जनतेने एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील जनतेला केले. मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तोडगा काढण्यासाठी फॉर्म्युला काढला आहे तर आपण स्वतः केंद्रीय गृहमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्याचे राज्यपालांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित 45 व्या संयुक्त परिषदेत ते बोलत होते.
खाणबंदीमुळे सुमारे दीड लाख लोक बेकार झाले आहेत. खाणबंदीमुळे दोन हजार कोटींचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. दोन हजार कोटी तिजोरीत आले तर गोव्याचा आर्थिक स्तर निश्चितच उंचावणार आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक फॉर्म्युला तयार केला आहे. मागील आठवडय़ात आपण केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. जर हे विषय सुटले तर गोवा प्रगती करेल, असेही आपण सांगितले आहे. मायनिंग विषय सुटायला हवा. श्रीमंत लोक गोव्यात मदत करायला तयार नाही. 300 कोटी रुपये लग्न कार्यावर खर्च करतील मात्र मदत करणार नाहीत. आपण गोव्यातील लोकांना पाठिंबा देत आहे. सरकार तसेच अन्य पक्ष यांनीही याकामी सहकार्य करावे. खाणबंदी व म्हादई या विषयावर राजकारण केले जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. शायना एन. सी. यांनीही हे लक्षात घ्यावे व मदत करावी, असेही राज्यपाल म्हणाले.
इंटरनॅशनल सेंटर गोवा येथे 45 व्या आंतरराष्ट्रीय संयुक्त परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती होती.