प्रतिनिधी/ पणजी
राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी खाण व्यवसाय हाच एकमेव पर्याय आहे, हे सरकारला कळून चुकल्याने आता खाणी सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने प्रयत्न चालविले आहे. पुढील चार महिन्यात खाण व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्याशीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चा केली आहे.
सध्या राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत बनली आहे. कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. खाण व्यवसायानंतर अर्थव्यवस्थेचा दुसरा पर्याय म्हणून पर्यटन व्यवसायाकडे पाहिजे जायचे. मात्र, कोरोनामुळे पर्यटन व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. यंदाच्या हंगामात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची तयारी सरकारने चालविली आहे. मात्र, कोरोनाच्या स्थितीवर सारे काही अवलंबुन आहे.
मागील काही वर्षांपासून राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे खाण व्यवसायावर अवलंबुन आहे. त्यामुळे आता सरकारने पुन्हा खाण व्यवसायावर लक्ष केंद्रीत करून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जून महिन्यात राज्याचे ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. खाणी सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे शक्य आहे, यावर चर्चा झाली होती.
सरकारने खाणी सुरू करण्यासाठी दोन पर्यायावर सध्या विचार चालविला आहे. एक म्हणजे फेरविचार याचिका दाखल करणे आणि त्याला समांतर केंद्र सरकारमार्फत गोवा, दमण, दीव मायनिंग कंसेशनला दुरूस्ती आणणे. याबाबतही सरकारने तयारी केली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेसोबतच राज्यातील बहुतेक व्यवसाय हे खाण व्यवसायावर अवलंबुन आहेत. त्यामुळे आता सरकारही खाणी सुरू करण्याबाबत गंभीर आहे.