प्रतिनिधी/ सातारा
राजकारणापेक्षा सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासाला कायम प्राधान्य देणार्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाल्यानंतर लगेचच विकासकामे मंजूरीसाठी पाठपुरावा सुरु केला आहे. राज्याच्या रखडलेल्या आणि चर्चेच्या ठरलेल्या खातेवाटपानंतर बुधवारी झालेल्या एकदिवसाच्या विशेष अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, जावली तालुक्यातील महत्वकांक्षी बोंडारवाडी धरण आणि सातारा जिह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मेडीकल कॉलेज ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. हे तीनही प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी आग्रही मागणी करुन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा एकदा आपला विकासकामांसाठीचा पाठपुरावा सुरु केला आहे.
एकदिवसाच्या अधिवेशनादरम्यान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगतच्या उपनगरे आणि त्रिशंकू भागांच्या विकासाला चालना मिळणार आहे. सातारा शहराचा आणि आसपासच्या परिसराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार सोयी- सुविधा मिळण्यासाठी हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे अत्यावश्यक असल्याने हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. उपनगरांच्या विकासासाठी हद्दवाढ हा एकमेव पर्याय असून सातारा पालिकेने वारंवार सदरचा प्रस्ताव नरविकास विभागाकडे पाठवला. याबाबत मी सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळात दि. 29 फेब्रुवारी 2016 रोजी तारांकित प्रश्नही केला होता. नगरविकास विभागाने सुचविलेल्या सर्व त्रुटींची पुर्तता सातारा नगर पालिकेने केली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला तातडीने मंजूर द्यावी आणि सातारा शहर व उपनगरांच्या सर्वांगिण विकासाचा अडसर दूर करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लेखी निवेदनाद्वारे ना. ठाकरे यांच्याकडे केली. हद्दवाढीबाबत मुख्यमत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन ना. ठाकरे यांनी यावेळी दिले. दरम्यान, हद्दवाढ प्रस्ताव मंजुरीबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास मंत्री ना. शिंदे यांनाही लेखी निवेदन दिले असून त्यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करु, असे आश्वासन दिले.
जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण हा महत्वकांक्षी प्रकल्प आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पास मंजुरी मिळाली असली तरी, जलसंपदा विभागाच्या सातारा कार्यालयाकडून ट्रायल पिट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण होण्यासाठी ट्रायल पिट घेणे अत्यावश्यक आहे. याबाबत बोंडारवाडी धरण कृतीसमितीने दि. 13 जानेवारी रोजी मेढा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. ट्रायल पिट घेवून बोंडारवाडी धरणाचे काम गतीने सुरु करावे, या मागणीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प तातडीने पुर्ण व्हावा. यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत सर्व विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावून हा प्रकल्प तातडीने पुर्णत्वास न्यावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार आणि ना. पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. याबाबत तातडीने बैठक लावून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दोघांनीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.
सातारा जिह्यासाठी वरदान ठरणार्या बहुचर्चीत आणि प्रलंबीत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न तातडीने सोडवावा, यासंदर्भातही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार आणि ना. पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. जागेचा प्रश्न न सुटल्याने तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा शासकीय रुग्णालयात मेडीकल कॉलेज सुरु करणे आणि त्यासाठीची पदनिर्मीती आणि पदनिश्चिती करणे तसेच प्रवेश प्रक्रिया राबवणे यासाठी मंजूरी मिळाली आहे. परंतु पुर्ण क्षमतेने मेडीकल कॉलेज सुरु करुन गोर गरीबांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि जिह्यातील युवकांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाची सोय करणे काळाची गरज आहे. त्यामुळे मेडीकल कॉलेजसाठीच्या जागेचा प्रश्न निकाली काढून तातडीने मेडीकल कॉलेज उभारणीसाठी योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. याबाबत आपण स्वत: लक्ष घालून सातारा जिह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली. हाही प्रश्न आपण लवकर सोडवू, असे आश्वासन ना. अजित पवार यांनी दिले.
मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेवाटप रखडले होते. मात्र खातेवाटपानंतर लगेचच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासकामांसाठी पावले उचलली असून मतदारसंघातील हद्दवाढ, बोंडारवाडी धरण आणि मेडीकल कॉलेज या तीन महत्वाच्या आणि गरजेच्या प्रकल्पांच्या पुर्तीसाठी पुन्हा पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या मागण्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधीत मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच हे तीनही प्रश्न मार्गी लागतील अशी आशा आहे.