राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप अनेक दिवस रखडले होते. अधिक पॅबिनेट मंत्री असलेल्या या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. या वाटपावरून नाराज असलेल्या आणि मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या अनेकांच्या नाराजी नाटय़ाचा पुढचा अंक राज्यातील जनतेला पहायला मिळू लागला.
कोकणातील दोन मंत्री खातेवाटपानंतर कार्यरत झाले. रायगड जिह्यातील आदिती तटकरे यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. रत्नागिरीचे उदय सामंत यांना पॅबिनेट मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना अनेक खाती देण्यात आली आहेत. उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन तसेच माहिती व जनसंपर्क या महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार देण्यात आला आहे. उदय सामंत यांना पहिल्यांदाच पॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. तसेच आदिती तटकरे यांनाही राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. सामंत यांनी यापूर्वी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या कामाची कल्पना त्यांना आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या आदिती तटकरे यांना पर्यटन व उद्योग खाते दिल्यामुळे त्या समाधानी आहेत. कोकणचा विकास या दोन खात्यांच्या आधारे करता येईल. त्यातून बेरोजगारी कमी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. कोकणासाठी चांगले काम करता येईल याचा मनस्वी आनंद आपल्याला होत आहे असे त्या म्हणाल्या. सार्वजनिक लाभाच्या अनेक योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम माहिती व जनसंपर्क मंत्रालय करू शकेल. जवळपास 7 खात्यांच्या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माझ्यासाठी हे खूपच महत्त्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या. आदित्य ठाकरे यांच्याकडे ज्या खात्याचे
पॅबिनेट मंत्रीपद आहे त्या खात्याचे राज्यमंत्रीपद आपल्याकडे असल्याने उत्तम समन्वय दाखवत कोकणचा कायापालट करण्याची जबाबदारी आपण पार पाडू असेही त्या म्हणाल्या.
कोकणात पर्यटनाच्या खूप मोठय़ा संधी आहेत. सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ कोकणात आहे असे म्हणता येणार नाही. या पर्यटकांना कोकणात आकर्षित करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे काम पर्यटन खाते करू शकेल. राजापूर तालुक्यातील नाणार येथील तेलशुद्धीकरण कारखाना असो अथवा रत्नागिरी तालुक्यातील वाटद परिसरातील औद्योगिक वसाहत असो दोन्ही ठिकाणी औद्योगिकीकरणाला विरोध केल्यामुळे शिवसेनेची प्रतिमा विकास विरोधी झाली आहे. भविष्यात रोजगार आणि कौशल्य वृद्धीचे कारण ठरणारे औद्योगिकीकरण कोकणात सुरू ठेवायचे की नाही याचा विचार शिवसेनेला करावा लागेल. आ†िदती तटकरे यांनी औद्योगिकीकरणाच्या राबवणुकीतून कोकणातील रोजगार प्रश्न सोडवू असे म्हटले आहे. त्यामुळे आता या सरकारची उद्योगनीती कशी राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपामध्ये सामंत यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते देण्यात आले आहे. सामंत हे राजकीय जीवनात वाटचाल करत असताना नेहमीच युवकांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. त्यांनी गेली अनेक वर्षे बहर नावाचा सांस्कृतिक उत्सव रत्नागिरीत सुरू ठेवला आहे. शेकडो नव्हे तर हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सहभागी होत असतात. तरुणाईला व्यासपीठ देणारी व्यवस्था सामंत यांच्याकडे आहे. त्यांच्या तरुणाईशी असलेल्या निकटच्या संबंधामुळे उच्च व तंत्रशिक्षण खाते त्यांच्याकडे सोपवले गेले असावे. त्यामुळे कोकणाचा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कोकणला शैक्षणिक हब बनवले जाईल असे विधान त्यांनी अलीकडेच केले आहे. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय करावे असा प्रश्न अनेक तरुणांकडे असतो. सध्या विज्ञान विषयासाठी अनेकांच्या उडय़ा विशिष्ट महाविद्यालयांसाठी पडत आहेत. परंतु बाजारात कोणत्या कौशल्याला मागणी आहे याचा विचार करून तरुण शिक्षण घेतात असे दिसत नाही.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीला कोणते कौशल्यधारक तरुण हवेत याचा विचार करून अभ्यासक्रम रचना करणे आणि कोकणातील तरुणांना ही रचना उपलब्ध करून देणे हे काम सामंत चांगल्याप्रकारे करू शकतात. त्यातून रोजगारासाठी कौशल्यवान तरुण उपलब्ध होऊ शकतात. परदेशांमध्ये देखील भारतीय तरुणांना अन्य देशांच्या तुलनेत उजवे माप दिले जाते. कष्टाळू आणि प्रामाणिक म्हणून भारतीय तरुणांना ही वागणूक मिळते. परदेशात कोणत्या कौशल्यांच्या संधी उपलब्ध आहेत हे लक्षात घेऊन तंत्रशिक्षणात आवश्यक ते बदल केले गेले तर कोकणातील तरुण हे चांगल्या संधींसाठी पात्र ठरू शकतील. यासाठी व्यापक योजना उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आखणे गरजेचे आहे. सामंत हे मुद्दे नेटाने पुढे नेऊ शकतात.
पर्यटनाच्या संधी कोकणात सर्वाधिक असताना त्याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ मात्र कोकणात उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशिक्षण देणारी महाविद्यालये मराठवाडा-औरंगाबादसारख्या ठिकाणी आहेत पण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसारख्या ठिकाणी छोटय़ा मुदतीचा एखादा कोर्स उच्च शिक्षण विभाग चालवत नाही. ही दुर्दैवाची बाब होय. कोकणातील जनतेला रोजगार संधी द्यायच्या असतील तर येथे विकल्या जाणाऱया मुद्यांना कुशल हात पुरवणे हे गरजेचे आहे. पर्यटन क्षेत्रातील विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान आहे. सामंत हे आव्हान पेलतील यात शंका नाही. स्वतंत्र कोकण विद्यापीठ उभारण्याविषयी ते सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांच्याकडे ते शब्द टाकणार आहेत. यामुळे स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी मार्गी लागली तर येथील मुलांना आणखी चांगल्या शिक्षण संधी उपलब्ध होतील हे नक्कीच.
सुकांत चक्रदेव