प्रतिनिधी/ बेळगाव
काँग्रेसने ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. खादरवाडी, पिरनवाडी, मजगाव, येळ्ळूर यासह इतर परिसरात शनिवारी प्रचार करण्यात आला. शुक्रवारी रात्री खादरवाडी येथे सभा घेण्यात आली. या सभेला मोठय़ा संख्येने मतदार उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
काँग्रेसने गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. शहरातील खासबाग, शहापूर यासह उपनगरांमध्ये जोरदार प्रचार केला. आता ग्रामीण भागामध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रचार सुरू आहे. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, किरण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते प्रचार करू लागले आहेत.
खादरवाडी येथे सभेमध्ये सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्याबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. भाजपने आजपर्यंत सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे. महागाईचा कहर झाला आहे. त्यामुळे जीवन जगणे मुश्कील झाले असून जर गोरगरिबांना न्याय मिळायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे रमेश गोरल यांनी सांगितले.
यापूर्वी राजहंसगड, सुळगा, येळ्ळूर परिसरात प्रचार करण्यात आला होता. धामणे येथेही प्रचार झाला होता. त्यानंतर आता खादरवाडीसह इतर भागात काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. येळ्ळूरमध्ये किरण पाटील यांनी विविध भागामध्ये जाऊन प्रचार केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत सुनीता ऐहोळे, सुधीर लोहार, रमेश कुंडेकर, राघवेंद्र सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.