वृत्तसंस्था / नवी दिल्ली
खाद्यतेलांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने आता हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या हालचालींमुळे खाद्यतेल स्वस्त होऊ शकते. यासंबंधी अन्न विभागाच्या सचिवांनी बुधवारी खाद्यतेल कंपन्या आणि तेल आयातदारांची बैठक बोलावून कंपन्यांना खाद्यतेलांच्या किमती 10 रुपयांपर्यंत कमी करण्यास सांगितले आहे. यामुळे आगामी दिवसांमध्ये खाद्यतेलांच्या किमतीत घट दिसून येऊ शकते.
बुधवारी झालेल्या या बैठकीत देशातील खाद्यतेलांच्या किमतींची समीक्षा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या किमतीत मोठी घट दिसून आली आहे. तरीही देशातील खाद्यतेलांचे दर अधिक आहेत. हेच पाहता सरकारने पुढाकार घेत खाद्यतेलाचे आयातदार तसेच उत्पादकांना चर्चेसाठी पाचारण केले होते. या बैठकीनंतर आगामी काळात देशातील खाद्यतेलांचे दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.