भाजीपाल्याच्या दरानेही गाठली पन्नाशी : रोजच्या आहाराला बसली महागाईची झळ
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावली होती. फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला महागाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खाद्यतेलापाठोपाठ डाळी आणि कडधान्यांच्या दरात वाढ झाली असून आहारातील वरण भात आणि उसळ देखील महागली आहे. कोरोना महामारी याचे मुख्य कारण असले तरी पावसाचा फटका बसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात होणारी आवक थंडावली आहे. यामुळे मागील पंधरा दिवसांपासून डाळी-कडधान्यांचे दर वाढले आहेत.
तूरडाळ 120 ते 125 रु. किलोवर जाऊन पोहचली असून परिणामी रोजच्या आहारातील डाळीला महागाईचा तडाका बसला आहे. ही दरवाढ 15 ते 20 रुपयांची असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त करण्यात आले. मूगडाळ 100 ते 105 रु. किलो, मसूरडाळ 80 ते 82 रु. किलो, उडीदडाळ 100 ते 130 रु. हरभराडाळ 75 ते 80 रु. किलो असा दर आहे. उडीदडाळ व हरभराडाळ यामध्ये प्रत्येकी दहा रुपयांची वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या दराने पन्नाशी गाठली असताना डाळींचा दर देखील शंभरी पार गेल्याने रोजच्या आहाराला महागाईची झळ पोहोचली आहे.
कडधान्यांचे दरदेखील कडाडले
भाजीपाल्यांना पर्याय म्हणून कडधान्यांचा वापर सर्रासपणे केला जातो. भाजीपाला महागल्याने कडधान्याची मागणी वाढते. मात्र सध्या कडधान्याचे दरदेखील कडाडले आहेत. मूग 95 ते 100 रु. किलो, जवारी मसूर 160 ते 170 रु, नाशिक मसूर 80 रु. किलो, हरभरा 65 ते 70 रु, लाल चवळी 60 ते 65 रु., मटकी 90 ते 100 रु., काळा वाटाणा 65 ते 70 रु. किलो आहे. सध्या बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. सध्या हे दर टिकून असून पुढे आवक होईल त्याप्रमाणे दर कमी-अधिक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.