खानापूर / प्रतिनिधी
खानापुरातील चारशे वर्षापूर्वीच्या जुन्या कवळे मठाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प गौडपादाचार्य श्री श्री शिवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी केला आहे. यासाठी जवळजवळ तीन कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून पुढील महिन्यात जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
याचा भुमिपूजन समारंभ गौड पदाचार्य शिवानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत उद्योजक शरद केशकामत व त्यांच्या पत्नी श्रद्धा केशकामत यांच्या हस्ते करण्यात आला. सदर मठ अत्यंत पुरातन असून त्या मठात तीन समाध्या आहेत. तसेच त्यामध्ये एक जीवंत समाधीही आहे. मठाच्या मध्यभागी उम मयेश्वर मंदिर देखील आहे. हे मठ पूर्वी कवळेमठ शाखाचे मुख्य केंद्र होते. स्वामीजींचा मुक्काम प्रामुख्यांने याच मठात होता. तसेच याच मठातून संपूर्ण शाखा मठांचाही कारभार सुरु होता. या मठात पूर्वी पाठशाळाही होती. यामुळे सदर मठाला विशेष महत्व होते. हेच पुरातन वैभव पुन्हा खानापूरच्या कवळे मठाला प्राप्त व्हावे, या दृष्टीने गौडपादाचार्य शिवानंद स्वामी महाराजानी पावले उचलली आहेत. या प्रकल्पाला गौड सारस्वत ब्राम्हण्य समाज बांधवानी देखील हातभार लावणे महत्वाचे ठरणार आहे. या मठाला लागूनच बांधलेल्या नुतन वास्तूमध्ये आता सर्व सोयीनियुक्त मंगल कार्यालय, मुंज तसेच इतर सभासमारंभ करण्याची सोय देखील करण्यात आली आहे. यामध्ये समारंभासाठी मुख्य हॉल, अद्यावत किचन तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. याचा शुभारंभही पुढील महिन्यात केला जाणार आहे.
मठाच्या भुमिपूजनानिमित्त होमहवन आदी कार्यक्रम विधीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी वे. शा. स. शार्दुल जोशी आणि त्यांची सहकारी ब्रम्हवृंदाने धार्मिक विधीचे पौराहित्त केले. यावेळी श्रीकांत नाईक, अशोक नाईक, सुभाष देशपांडे, दिलीप शहापूरकर, प्रकाश देशपांडे, डॉ. विवेक गुंजीकर, प्रमोद दलाल, प्रदीप दलाल यासह सारस्वत समाजातील इतर नागरिक उपस्थित होते. या मठात आता पूर्वीप्रमाणे पाठशाळाही सुरु केली जाणार आहे. नूतन इमारतीत तीन समाधी स्थळांची सुधारणा, देव खोली, हॉल, स्वामीजी निवासस्थान, मठामध्ये बाहेरुन येणाऱया समाजबांधवाना राहण्याची सोय यासह इतर सोयी करण्याचा निर्णय घेण्यात आला.