प्रतिनिधी / खानापूर
आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून महाविद्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत. मात्र विद्यार्थी व प्राध्यापक वर्गासह कर्मचारी वर्गानीही कोरोना अहवाल सादर करुनच महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असा राज्य सरकारचा आदेश असल्याने प्राध्यापक वर्गासह विद्यार्थी व पालकांची सरकारी केंद्रांमध्ये स्वॅब तपासणीसाठी धावपळ सुरू होती. आता मात्र प्रत्येक महाविद्यालयात स्वतः आरोग्य खात्याकडून एखाद्या अधिकारी जाऊन स्वॅब तपासणी करणार असल्याने विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधिपत्याखाली येणाऱया दोन महाविद्यालयाची बुधवारी कोविड चाचणी करण्यात आली. तालुक्यातील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या आवारात देखील येथील गणेबैल प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने एक स्वतंत्र्य कोविड केंद्र स्थापित करुन महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापकांची, कर्मचाऱयांची व विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. यावेळी 25 प्राध्यापक व कर्मचारी वर्गासह 10 हून अधिक विद्यार्थ्यांची कोविड चाचणी झाली. चाचणीसाठी प्राध्यापक वर्गासह विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर ठेऊन बसण्याची सोयदेखील करण्यात आली होती.
युजीसीच्या नियमावलीनुसार महाविद्यालयातील कर्मचाऱयांकडून दोन दिवसाआधीच संपूर्ण वर्गाचे सॅनिटायझेशन केले असून एका वर्गात किमान 40 ते 50 विद्यार्थी स्वतंत्र्यपणे बसण्याची सोय केली आहे. शिवाय कोणत्याही विद्यार्थी अथवा शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन ठेवण्यात येणार असून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग घेण्याची सुविधा प्राचार्य वर्गाकडून केली आहे. बुधवारी खानापूर शहरातील तीन महाविद्यालयामध्ये ही कोविड चाचणी केली असून शासनाच्या आदेशाचे पालन विद्यार्थी वर्गानी काटेकोरपणे केले आहे. यामुळे एक दिवसातच काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी पूर्ण झाली असून उर्वरित विद्यार्थ्यांची तपासणी आज होणार आहे. तपासणीला गणेबैल केंद्राच्या वैद्याधिकारी डॉ. राजश्री पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, लॅब टेक्निशिएन संजय धनुचे, गजेंद्र भोराट, प्राध्यापक व प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर आदींचे सहकार्य लाभले. जी. वाय. बेन्नाळकर (म. मं. महाविद्यालय प्राचार्य): राज्य शासनाच्या आदेशानुसार आम्ही महाविद्यालयीन आवारात कोविड चाचणी करीत असून 100 हून अधिक विद्यार्थ्यांची चाचणी पार पडली. चाचणीचा संपूर्ण खर्च सरकारमार्फत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने आम्ही महाविद्यालयात कमिटीची उभारणी केली आहे. यामध्ये सामाजिक अंतर राखण्याबरोबरच विद्यार्थी वर्गाचे दररोज सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी घरातूनच पाण्याची बॉटल व डबा घेऊन यायचा असून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला अथवा पालकांना महाविद्यालयात कोविड अहवालाशिवाय प्रवेश देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय एका वर्गात किमान 50 विद्यार्थांनाच बसविण्यात येणार असून दोन विद्यार्थ्यांमध्ये 1 मीटर अंतर ठेवले असून 6 फुटचा अंतर ठेऊन बेंचची सोय केली आहे.