आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न सार्थकी : योजना पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहर व तालुक्यात गेल्या साडेतीन वर्षात पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनांमध्ये एकही घर मंजूर झाले नव्हते. विधिमंडळात आवाज उठवून तालुक्यातील घरकुल प्रश्नांकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. मंत्र्यांनी याची दखल घेऊन यावर्षी खानापूर शहरात 469 व ग्रामीण भागात 1600 अशी एकूण 2200 घरे मंजूर केली आहेत.
या योजनेचा लाभ खऱया लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी अधिकाऱयांनी योजना अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवावी, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोमवारी येथे स्लम बोर्डामार्फत मंजूर झालेल्या 469 घरांच्या भूमिपूजन समारंभात बोलताना केले.
नगरसेवकांचे सहकार्यही महत्त्वाचे
त्या म्हणाल्या, या योजनेबरोबरच शहराच्या अंतर्गत विकासासाठी नगरोत्थान योजनेखाली 5 कोटी रु.चे अनुदान मंजूर झाले आहे. शहराच्या विकासाची राहिलेली कामेही मार्गी लागावीत, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासाठी नगरसेवकांचे सहकार्यही महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रारंभी स्लम बोर्डाचे साहाय्यक अभियंता पनीराज एम. जी. यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, खानापूर शहरातील डोंबारी वसाहत, नाईक गल्ली, ढोर गल्ली, हरिजनवाडा हा भाग स्लम बोर्डाच्या कक्षेत येतो. या तिन्ही भागांसाठी पंतप्रधान आवास योजनेखाली 469 घरे मंजूर झाली आहेत.
या भागात मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी 50 लाखांची योजना मंजुरीसाठी स्लम बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी कमिटी अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मल्लेशी पोळ यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शंभू निंगाप्पा, मुख्याधिकारी बाबासाहेब माने, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक विनायक कलाल, शोभा गावडे, लता पाटील, तोईद चांदकन्नावर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यासह नाईक गल्लीमधील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
मंजूर झालेल्या 469 घरांपैकी शाहूनगर (डोंबारी वसाहत) साठी 128, नाईक गल्लीसाठी 182 व हरिजन गल्लीसाठी 159 घरांचा समावेश आहे.