योजना आखूनच कळसा-भांडुराचे पाणी सोडा : पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांचे मत
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षात निर्माण झालेली पूरपरिस्थिती डोळय़ासमोर ठेवून कळसा-भांडुरा प्रकल्पातील पाणी मलप्रभा नदीमध्ये सोडल्यास नदीकाठावरील गावांना कोणता धोका उद्भवेल, तो संभाव्य धोका टाळण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करता येईल, याचा आराखडा तयार करूनच त्या प्रकल्पातील पाणी सोडण्याचा विचार योग्य ठरेल, असे मत विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी खानापूर सरकारी विश्रामधामात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
तालुक्यात गेल्या तीन वर्षातील पूरपरिस्थिती गंभीर असतानाच कळसा-भांडुरा प्रकल्पातील 7.5 टीएमसी पाणी मलप्रभेत सोडल्यास काय परिस्थिती उद्भवेल, असा सवाल पत्रकारांनी केला असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, खानापूर शहरातील दुर्गानगर, मारुतीनगर आदी वसाहतीत पुराचे पाणी घुसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची तसेच शहराजवळील मलप्रभेवरील पूलवजा बंधाऱयाची या दौऱयात मी पाहणी केली आहे. यापुढील काळात दुर्गानगर वसाहतीमध्ये पुराचे पाणी घुसू नये यासाठी जवळ असलेल्या नाल्याला संरक्षक भिंत उभारावी लागेल, तसेच मारुतीनगरमधील वसाहतीतही पुराचे पाणी घुसू नये यासाठी मलप्रभेवर असलेला पूलवजा बंधारा तसेच त्याला जोडणाऱया रस्त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी त्या दोन्ही योजना मंजूर होण्यासाठी राज्य शासनाकडे मी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामार्गाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधणार
या दोन वसाहतीतील पूरग्रस्तांची परिस्थिती राज्य शासनाने अवघड करून ठेवली आहे. 2019 व 2020 साली झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील राज्य शासनाने अद्याप दिलेली नाही. घरे बांधून देण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप संबंधित घरमालकांना मिळालेली नाही. याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त करून या संदर्भात राज्य शासनाची कानउघाडणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खानापूर-रामनगर महामार्गाचे काम तसेच लोंढा-रामनगर मार्गावरील पांढरी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. याकडेही पत्रकारांनी लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्या रस्त्याला अद्याप अनुदान मंजूरच झालेले नाही. यासंदर्भात भाजपची नेतेमंडळी आपल्या नेहमींच्या सवयींप्रमाणे जनतेला खोटी आश्वासने देत आहेत. या संदर्भात आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन या महामार्गाच्या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले असता, एक मुख्यमंत्री बदलला तरी तो भ्रष्टाचार कमी होणार का, असा सवाल करत सध्या राज्यामध्ये पूरस्थिती असताना भाजप शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. येडियुराप्पा शासनाकडून गेल्या दोन वर्षात कोणतीच विकासकामे झालेली नाहेत. 2024 साली होणाऱया विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची बहुमताने सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खानापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी
याआधी सिद्धरामय्या यांनी खानापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्तांच्या समस्याही जाणून घेतल्या. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वसाहतीला दरवर्षी पुराचा कसा तडाखा बसतो, याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य गोंधळी यांनी दिली. या प्रशिक्षण केंद्रासाठी मन्सापूर येथे 80 एकर जमीन मंजूर झाली आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र हलविले जाईल. पण यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. यानंतर त्यांनी दुर्गानगर वसाहतीमधील पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. मच्छी मार्केटमधील व्यावसायिकांनीही आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मच्छी मार्केटमधील व्यावसायिकांचे अन्य जागेत स्थलांतर करण्याची सूचना तहसीलदारांना केली. त्यांच्या समवेत आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार अशोक पट्टण, वीरकुमार पाटील, लक्ष्मण चिंगळे, नेतेमंडळी व अधिकारी उपस्थित होते.
संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळाला भेट
खानापूरच्या दौऱयानंतर त्यांनी नंदगडमधील संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळालाही भेट दिली. संगोळ्ळी रायण्णा प्राधिकरणाला संगोळ्ळी व नंदगडच्या विकासासाठी 265 कोटींचे अनुदान मंजूर केले असल्याचे सांगितले.