शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला : गोल्याळीत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते पुतळय़ाचे अनावरण
खानापुरात विविध संघटनांतर्फे शिवजयंती साजरी
प्रतिनिधी /खानापूर
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेवाद्वितीय राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवरायांनी रयतेच्या राज्याची स्थापना करताना सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले. आजच्या धार्मिक असंवेदनशीलतेच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचे कर्तृत्व समाजाला दिशा दाखवणारे असल्याचे मत आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विविध संस्थांच्यावतीने शिवस्मारक येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार डॉ. निंबाळकर यांनी राष्ट्रपुरुषांना कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचे मानवतावादी विचार आणि कर्तृत्व समजून घेण्याचा प्रत्येकाने गांभीर्याने प्रयत्न करावा. ज्या दिवशी खऱया अर्थाने राष्ट्रपुरुषांचे नेमके विचार कळतील, त्या दिवशी समाजात शांती, सलोखा आणि स्थैर्य नांदायला वेळ लागणार नाही. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमींनी घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला.
या कार्यक्रमाला शिवस्मारक ट्रस्टचे अध्यक्ष एम. पी. पाटील, बी. बी. पाटील, अजित पाटील, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, परवेज टेकडी, किरण कोडोळी, इसाखान पठाण, एम. जे. बेनकट्टी आदी उपस्थित होते.
गोल्याळीत शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मोगलांविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजातील सर्वसामान्यांना तसेच रयतांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या जीवनाचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून युवापिढीने वाटचाल करावी, असे आवाहन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील गोल्याळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण करताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा तनुजा गुरव होत्या.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर पुढे म्हणाल्या, गोल्याळी येथील तरुणांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांना पुतळा बसवण्यासाठी सर्वप्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. आज माझ्या हातून त्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याचे पाहून मनाला आनंद वाटतो. खानापूर तालुक्याचा विकास देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात भाजप शासन आहे. यामुळे काँग्रेस आमदारांची कामे करण्यात भाजप शासनाकडून अन्याय केला जात आहे. तरीदेखील राज्य शासनाशी भांडूण तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे चालविला आहे. यामुळेच आता तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचा विकास, खानापूर येथे प्रसृतिगृह व लहान मुलांसाठी 60 बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल तसेच शेती विकासासाठी जलसिंचन योजनेची कामे सुरू झाली आहेत. तसेच लवकरच खानापूर येथे 8 कोटी रु. खर्च करून अद्ययावत बसस्थानक बांधले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला गोल्याळी, तोराळी, बैलूर, आमटे आदी परिसरातील शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ओलमणी
ओलमणी येथील शिवप्रेमी युवक मंडळाच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार शनिवारी उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी हणमंत जगताप यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ग्राम पंचायत सदस्य अशोक सुतार, जांबोटी कृषी पत्तीन संघाचे व्यवस्थापक खंडोबा राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य अशोक सुतार, प्रभाकर साबळे, भारतीय जवान तुषार गुंजीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जांबोटी ग्राम पंचायतचे अध्यक्ष महेश गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राजषी शाहू हायस्कूलचे शिक्षक ए. जे. सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, साडेतीनशे वर्षे झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आणि विचार अद्यापही आमच्या मनावर कायम आहेत. यापुढे देखील त्यांच्याच विचारातून आम्ही मार्गक्रमण करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज समस्त तरुणवर्गासाठी प्रेरणा असून, शिवजयंतीसारख्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि आदर्श युवकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर शिवप्रति÷ान हिंदुस्तानचे कार्यकर्ते संतोष गोरल तसेच राजू चिखलकर, पिंटू नवलकर, किरण साबळे, श्रीनाथ खाडे, वैभव राऊत, शामराव साबळे, प्रशांत साबळे, प्रमोद चिखलकर, लखन साबळे, विनायक राऊत, पुंडलिक पाटील, गंगाराम साबळे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ, युवक वर्ग तसेच शालेय विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
कसबा नंदगड
कसबा नंदगड, ता. खानापूर येथील शिवस्मारक चौकात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी दुर्गामाता दौड कमिटीचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते शिवपुतळय़ाला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर टी. वाय. पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. शिवजयंती साजरी करण्यासाठी परशराम पाटील, महादेव बरगांवकर, मंजू धबाले, रामराव पाटील, बापू पाटील, गजानन पाटील, राहुल पाटील, भूषण करडी, नितीन पाटील व सम्राट युवक मंडळ, दुर्गामाता दौड आयोजक मंडळ व शाळकरी मुले मोठय़ा संख्येने उपस्थित होती. शेवटी परशराम पाटील यांनी आभार मानले.